फडणवीस हे कोणात्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत अशी अपेक्षा मंत्री जयंत पाटील यांचा विरोधी पक्षनेते आणि अजित पवारांना टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राजकारणात सत्तेच्या बाकावर किंवा विरोधकांच्या बाकावर असो आपली सद्सदविवेक बुध्दी शाबूत ठेवावी लागते. जर सद्सदविवेक बुध्दी हरवली की आपली दिशा आणि ध्येक चुकते. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे इथल्या कोणत्याही सदस्यांच्या प्रलोभनाला बळी पडून त्या बाकावरून या बाकावर येण्याचा प्रयत्न करणार नाहीत असा टोला विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना लगावला.
विरोधी पक्षनेते पदी फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते.
निवडणूकीच्या काळात मतदारसंघातील लोकांना मी नेहमी सांगायचो की, मी सभागृहातल्या पहिल्या बाकावर बसणार आहे. मात्र ते कुठल्या बाजूच्या पहिल्या बाकावर बसणार हे सांगत नव्हतो. तसे विधानसभा निवडणूकीच्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा येईन म्हणाले होते. पण आल्यावर कुठे बसणार हे त्यांनी सांगितले नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेतेपदी बसल्यानंतर आता अभिनंदन केले पाहीजे. मी असे बोलणार नाही की, आपण कायम विरोधी पक्षनेतेपदी बसावे. त्यामुळे उत्साह कमी होतो. तुम्ही पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने आणि लोकशाही मार्गाने २०२४ ला इथे सत्ताधारी बाकावर या, असे म्हणण्याऐवजी त्यासाठी प्रयत्न करावे असा खोचक सल्ला त्यांनी दिला.
२०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या आधी भाजपा नेते नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये सर्वात लायक उमेदवार हे देवेंद्र फडणवीसच असल्याचे सांगितले होते. आता विरोधी पक्षनेते पदासाठी तेच लायक असल्याचे सांगण्यात येत होते. हे आम्हाला मान्य करावे लागेल. यातून माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळत असल्याचे सांगत कारण ते मुळचे आमचे आहेत. त्यांचा समावेश तुमच्यात करणार नाही त्यांना आणि आमच्यातल्या अनेकांना आम्ही पुन्हा ओढून घेणार असल्याचे त्यांनी सांगताच सभागृहात एकच हशा उसळला.
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मला एकदा सभागृहात म्हणाले होते की, ऑक्टोबर २०१९ साली शिवडी-न्हावा-शेवा ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचे उदघाटन होणार तेव्हा मी तुम्हाला सोबत नेणार असे सांगितले. त्यावेळी मी त्यांना गंमतीने म्हणालो होतो की, लवकर प्रकल्प पुर्ण करा नाहीतर प्रकल्प पूर्ण झाल्याचे दाखवायला मी तुम्हा घेवून जाईन. मात्र ती वेळ इतक्या लवकर येईल, असे वाटले नव्हते असे सांगत फडणवीस यांच्या कार्यकालात अर्धवट राहीलेला प्रकल्पांकडे अंगुलीनिर्देश केला.

About Editor

Check Also

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा- विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *