विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत होती. मात्र महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. तसेच त्यांनी स्वतः ऐवजी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळे काँग्रेसकडून याबाबत आक्षेप घेत शिवसेना उबाठाने विश्वासात न घेता परस्पर उमेदवार बदलल्याने नाराजी व्यक्त केली. परंतु अखेर शेवटच्या क्षणी काँग्रेसनेही शिवसेना उबाठाचे अंबादास दानवे यांच्या नावावर सहमती दर्शविली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मान्यता दिली.
शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार देत त्यांनी स्वतःऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या नावाला मान्यता देत पाठिंबा दिलेला असताना शिवसेना उबाठाने परस्पर उमेदवार बदलला यावरून काँग्रेसने नाराजी दर्शविली. तसेच काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देण्याचे जाहिर केले.
LIVE: पत्रकार परिषद, 📍गांधी भवन, कुलाबा https://t.co/scIxrXLOgL
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 30, 2026
त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अखेर शिवसेना उबाठाचे नेते अनिल परब, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी काँग्रेसने विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात आगामी राज्यसभेच्या निवडणूकीत एक जागा देण्याची मागणी केली. त्या बदल्यात विधान परिषदेच्या निवडणूकीत दोन जागेवर पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसकडून दर्शविण्यात आली. परंतु काँग्रेसने शिवसेना उबाठाला दिलेल्या या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याची माहिती पुढे येत आहे.
परंतु किमान काही समान मुद्यावर शिवसेना उबाठाने सहमती दर्शविल्याने काँग्रेसनेही अखेर शिवसेना उबाठाचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या नावाला मान्यता दर्शविली. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उबाठाचे अनिल परब आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
दरम्यान अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचा एक तास शिल्लक राहिलेला असताना काँग्रेसच्या ग्रीन सिग्नलनंतर उमेदवारी अर्ज भरला. मात्र अंबादास दानवे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार नसल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहिर करण्यात आली.
Marathi e-Batmya