भोंग्याच्या प्रश्नावरून मुंबई पोलिसांनी मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीसा आणि धरपकड करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर अटकेची कारवाई करताना देशपांडे हे पोलिसांच्या हातातून निसटून त्यांच्याच गाडीत बसून पळून गेले. त्यानंतर जवळपास तीन आठवड्यांपासून ते ‘नॉट रीचेबल’ झाले होते. या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र जामीन मंजूर करताना काही अटीही घातल्या आहे. त्यामुळे किमान आता तरी हे दोघे सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पळून जाण्यात मदत करणारा देशपांडे यांच्या गाडीच्या चालकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यासही आता जामीन मिळाला.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३५३ चा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हे दोघे नॉट रीचेबल होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात केला होता. गेल्या १५ दिवसांपासून शिवाजी पार्क पोलीस आणि गुन्हे शाखेची टीम त्यांच्या शोधात होती. अखेर या दोघाबरोबर त्यांच्या गाडीच्या चालकासही न्यायालयाने जामीन दिला मात्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं होतं. यानुसार राज्याच्या विविध भागात मनसे कार्यकर्त्यांकडून असे प्रयत्न होत होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत होते. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी ४ मे रोजी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली. भेट घेऊन बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस व्हॅनमध्ये नेवून बसविण्याचा प्रयत्न केला असता संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही पोलिसांच्या ताब्यातून निसटून पळून गेले. पळून जाण्यासाठी गाडीत बसताना महिला पोलिसांनीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न गेला. त्यावेळी झालेल्या झटापटीत महिला पोलिस कोसळून पडल्या त्यात त्या जखमी झाल्याचेही दिसून येत आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना पोलीस ताब्यात घेत होते, तेव्हा इनोव्हा गाडीतून ते पलायन करत असताना रोहिणी माळी नावाच्या महिला कॉन्स्टेबल धक्का लागून जमिनीवर पडल्या. पीआय कासार यांच्या पायावरून त्यांची गाडी गेली. तेव्हापासून हे दोघे नॉट रीचेबल आहेत. यादरम्यान मुंबई पोलिसांच्या टीमने गोव्यापर्यंत जाऊन त्यांचा शोध घेतला होता.
दरम्यान, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं काही अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची अट समाविष्ट आहे. चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत हजेरी लावण्याची अट लागू असण्याची शक्यता आहे. जर या अटीचं उल्लंघन झालं, तर जामीन रद्द करण्यासाठी पोलीस पुन्हा अर्ज करू शकतात असे स्पष्ट केले.
येत्या २३ तारखेला सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पोलीस स्थानकात त्यांना हजेरी लावायची आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला १ आणि १६ तारखेला सकाळी ११ ते २ या कालावधीत त्यांना शिवाजी पार्क पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांसोबत तपासात सहकार्य करायची अट घालण्यात आल्याचे अॅड प्रदीप घरत यांनी सांगितले.
Marathi e-Batmya