“सध्या रिक्षावाला, चहा वाल्याचे दिवस चांगले”, म्हणणाऱ्या अजित पवारांचे दिवस नेमके कसे? गडचिरोलीतील ‘शासन आपल्या दारी’साठी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदेंसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार जाणार

बरोबरच चार महिन्यापूर्वी मार्च महिन्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून पहिलाच अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले. त्यानंतर यथावकाश अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सांगताही झाली. त्यावेळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रथे प्रमाणे त्यावेळचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्प आणि एकदंरतच अधिवेशनातील कामकाजाबद्दल पोटतिडकीने विधिमंडळ व मंत्रालय वार्तहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. आणि शेवटी म्हणाले, “सध्या रिक्षावाल्याचे आणि चहावाल्याचे दिवस चांगले आहेत” अशी उपरोधिक टीपण्णी केली. पण ती टीपण्णी कोणाला उद्देशून केली हे वेगळे सांगायला नको.

मात्र ज्यांच्याबद्दल अजित पवार यांनी टीपण्णी केली आज त्यांच्याच मागे फिरण्याची पाळी त्यांच्यावर आल्याने अजित पवार यांचे दिवस नेमके कसे म्हणायचे अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच रंगली आहे.

दरम्यान, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी ८ जुलै रोजी गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ, दाखल्यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून कळविण्यात आली आहे.

या कार्यक्रमात नागरिकांना विविध शासकीय दाखले, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवासाचे दाखले, नॉन क्रिमिलेअर, शेतकरी दाखला, कामगार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्ड दुरूस्ती, ग्रामपंचायतीमधील विविध दाखले, नागरिकांचे विविध अभिलेख, मतदार नोंदणी अथवा नाव दुरूस्ती अशा अनेक प्रकारच्या दाखल्यांची किंवा कागदपत्रांची गरज असते. यातील वेगवेगळ्या ३३ योजना, सेवांचा लाभ गडचिरोली जिल्ह्यात दिला जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतून अशा योजना, सेवांसाठीच्या कागदपत्रांचीही एकाच छताखाली पूर्तता करून दिली जात आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *