नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य तातडीने पाऊले उचलण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

नागपूर येथील महत्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावित, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबत बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंग, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारे विकास शुल्क हे जनतेला परवडेल असे करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. मिहान प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्धता होण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मिहान परिसरातील ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेले व्यापारी संकुले ही त्या ग्रामपंचायतीना हस्तांतरीत करावी, यामुळे संबधित ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. तसेच पुनर्वसन काळातील मिहान भागातील ग्रामपंचायतींना पाठवलेले पिण्याच्या पाण्याचे बिल संबधित यंत्रणांनी कमी करावेत,असेही यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत बोलताना म्हणाले की, मिहान परिसरात असणाऱ्या म्हाडा वसाहतीतील रहिवाश्यांना त्या परिसराच्या बाहेर जागा उपलब्ध करुन देत त्यांचे स्थलांतर करावे. तसेच मिहान प्रकल्पबाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी विकसित भूखंड वाटप लवकरात लवकर करावे. मिहान परिसरातील ग्रामपंचायतींना करवसुलीचे अधिकार नसल्याने उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही, या ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी एमआयडीसीकडून वापरण्यात येणारे सूत्र वापरण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी दिल्या.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *