राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने इच्छुकांच्या आशा पल्लवित मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पुन्हा उधाण

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीतील विजयाने भाजपमध्ये एकच उत्साह वाढला. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याने या सर्वांना खुष करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोणतीच हालचाल झाली नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेतल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राज्य मंत्रिमंडळातील कृषी मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, आरोग्य, गृह मंत्री, सांसदीय कार्यमंत्री अशी मिळून पाच मंत्री पदे रिक्त आहेत. सध्या गृहमंत्री पद मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले असून इतर मंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार गिरिष महाजन, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल आणि विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे यांच्यासह अनेक जण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यातच विखे-पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचे भाजपकडूनच सांगण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर आणि अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होण्याच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रविवार आधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *