शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केलीच पण त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आमदार गायकवाड यांनी यावेळी कॅाम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही भाष्य केलेले आहे, अशा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यास का घाबरतात?, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आमदार संजय गायकवाड हे सातत्याने दादागिरी व गुंडगिरी करत असतात. आमदार कॅटिंनमध्ये कामगारांना मारहाण करणे, बुलढाण्यात वाळू तस्करी, जबरदस्तीने जमीन बळकावणे, कोणालाही अत्यंत खालच्या भाषेत शिविगाळ करणे, ही त्यांची गुन्हेगारी कृत्त्ये सुरुच आहेत. एवढेच काय तर भाजपा हा हिजड्यांचा पक्ष आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडा, राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस देऊ, असे प्रताप या आमदार महोदयांनी यापूर्वी केले आहेत. फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाला दिलेल्या शिव्यांची तरी दखल घेऊन आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी, पण मुख्यमंत्री मात्र या आमदाराला पाठीशी घालत आहेत, असा आरोप केला.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक आपल्यासाठी मोठा दस्तावेज आहे, पण या पुस्तकावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाही अपमान केला. भाजपा व त्यांचे हस्तक शिवाजी महाराज यांचा अवमान करत असतात, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यासारख्या विकृत्तांनी महाराजांचा अपमान केला त्यावेळीही फडणवीस यांनी बोटचेपी धोरण स्विकारले होते. भगतसिंह कोश्यारी, मंगलप्रभात लोढा यांनीही महाराजांचा अपमान केला, त्यावेळीही फडणवीस यांनी काहीच कारवाई केली नाही. छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांचे फडणवीस एकप्रकारे समर्थनच करत आहेत, असे यावरून दिसते अशी टीकाही यावेळी केली.
रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मराठीचे संवर्धन झालेच पाहिजे, त्यावर दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील सर्वांना मराठी भाषा अवगत झाली पाहिजे पण त्यासाठी सक्ती करण्याची गरज नाही, हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रकार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण त्यापुढे सरकारने काहीच केले नाही, राज्यातील सरकारी खासगी अशा प्रत्येक विद्यापीठात मराठीचा स्वतंत्र विभाग निर्माण केला पाहिजे, असेही म्हणाले.
Marathi e-Batmya