देशातील चार राज्ये व एका केंद्रशासीत प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत असून ९ तारखेला केरळमध्ये मतदान होत आहे. मुंबईतील केरळचे नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज आपल्या गृहराज्यात रवाना झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुंबईतून केरळला जाणाऱ्या बसला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार अमिन पटेल व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, निवडणुका लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाही पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. केरळचे जे लोक रोजीरोटीसाठी मुंबईत आहेत ते आज केरळला जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. मतदानाच्या दिवशी अनेक लोक सुट्टी समजून मतदानाला न जाता बाहेरगावी पर्यटनाला, सहलीला जातात पण केरळचे नागरिक जेथे काम करतात तेथून निवडणुकीच्यावेळी आपल्या राज्यात जातात. वोटचोरीमुळे निवडणूक प्रक्रिया डागाळलेली आहे, पैसा फेक तमाशा देख, असे चित्र असताना मतदानासाठी आपल्या राज्यात जाणे ही अत्यंत चांगली घटना आहे. १०० टक्के मतदान कसे होईल, यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. केरळचा माणूस कामासाठी दुसऱ्या राज्यात जातो पण मतदानाला मात्र आवर्जून आपल्या राज्यात जातो. आखाती देशातील युद्धामुळे अनेक केरळी नागरिक अडकून पडले आहेत, त्यांना मतदानात सहभागी होता येत नाही त्याची हळहळ आहे, असेही सांगितले.
बारामतीच्या पोटनिवडणुकीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीवरून कोणताही वाद नाही. लोकशाहीच्या उत्सवात सुचिते अनुसार कोणी पुढे जात असेल तर त्यात वावगे काय, असे सपकाळ म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानावर बोलणे टाळले.
Marathi e-Batmya