मागील काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सततच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा झडत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी रात्री उशीराने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटल्याचे वृत्त पुढे आली. तसेच त्यांच्या संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नव्या कॉलेजच्या उद्घाटनाला भाजपाचे नेते नितीन गडकरी हे जातीने उपस्थित राहिल्याचे दिसून आले. तसेच जयंत पाटील यांनी मागील दिवसांपासून प्रसार माध्यमापासून पक्षाची भूमिका मांडण्यापासूनही दूर रहात असल्याचे दिसून आले.
त्यातच शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला होता. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी माझ्यावर विश्वास ठेवू नका माझे काही खरे नाही असे वक्तव्य केले होते. त्यावरून जयंत पाटीलही भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे बारामतीत शरद पवार यांच्या भेटीसाठी आले असल्याचे दिसले.
त्यानंतर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मी नाराज वगैरे काही नाही, पण आता कसं झालयं की मला बाहेर बोलायचीही चोरी झालीय. मी जे भाषण शक्तीपीठाच्या विरोधात आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात केलं त्याचा रेफरन्स पहा. तेव्हा मी सांगितलं की, लोक मोबदला वाढला की बदलतात, त्यामुळे तुम्ही सर्वांच नक्की आहे का ते सांगा. तसेच राजू शेट्टी यांनी यांचा झेंडा घेतला म्हटल्यावर काहीह अडचण नाही, आता हा विनोदाचा भाग होता, की राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही. त्यांना आम्ही उभा राह्यला सांगत होतो. त्यामुळे तुम्ही माझं गृहीत धरू नका तुमचं आंदोलन सुरु ठेवा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे अशी त्या मागची भावना होती. पण लगेच मी पक्षावर नाराज आहे आणि पक्ष सोडणार असल्याची चर्चा आली. मी रोज स्पष्टीकरण देणंही बरोबर नाही असेही यावेळी सांगितले.
तसेच माझं काही खरं नाही हे विधान शरद पवार यांच्यासाठी होतं का असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, आम्ही एकाच कुटुंबातील आहोत. आम्ही असे एकमेकांना इशारे देत बसत नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे. आमचा निवडणूकीत पराभव झालेला असला तरी शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. त्यांचा तो पक्ष आहे. त्यामुळे जे काही निर्णय असेल ते आम्ही एकत्रित घेऊ. कोणी एकट्याने तिकडे-इकडे जाऊ असा कोणताही निर्णय आम्ही चर्चेला घेतही नाही असेही यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दावा केला होता की, जयंत पाटील शरद पवार यांच्या पक्षात लवकरच भूकंप होणार असल्याचे भाकित वर्तवित जयंत पाटील हे लवकरच अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील असे सांगितले होते.
Marathi e-Batmya