भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ केला आहे. तुमचे हक्काच्या मतदान भाजपाने चोरले आहे. ईव्हीएम हॅकबद्दल लोक बोलतात पण महाराष्ट्रात तर मुख्यमंत्रीच हॅक केला आहे. भाजपा व त्यांच्या खास मित्राची नजर धारावी व सायन कोळीवाड्याच्या जमिनीवर आहे. धारावीकरांना बेघर करु पाहणाऱ्या प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर द्या आणि मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजयी झेंडा फडकवा, असे आवाहन काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी केले आहे.
धारावी विधानसभेच्या काँग्रेस मविआच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत कन्हैयाकुमार यांनी शिंदे भाजपा सरकारवर तुफान हल्लाबोल केला, ते पुढे म्हणाले की, धारावीत कष्टकरी लोक राहतात, त्यांनी मेहनतीच्या जोरावर धारावीचे नाव केले आहे, त्याच धारावीकरांना बेघर करण्याचे पाप भाजपा करत आहे परंतु धारावीवर कोणतेही संकट आले तर धारावी वाचवण्यात काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी होईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता तुमच्या सुख दुःखात सहभागी होणारा आहे. तुमचे हक्क, अधिकार व स्वाभिमानाचे रक्षण काँग्रेस महाविकास आघाडीच करणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राशी गद्दारी करणारे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानीशी खेळणारे भाजपा शिंदे यांची भ्रष्ट महायुती आहे. घर बनवण्यासाठी जसे एका एका विटेची गरज असते तशीच सरकार बनवण्यासाठी एका एका आमदाराची गरज असते. धारावीतून मविआच्या उमेदवाराला विजयी करा तसेच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राशी गद्दारी करुन लाडक्या मित्राचे घर भरणाऱ्या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहनही यावेळी केले.
Marathi e-Batmya