शिंदे गटाच्या खासदारापाठोपाठ आशिष शेलार म्हणाले, सचिन वाझे ठाकरेंचा माणूस कागदोपत्री सिध्द झाले आहे

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हणाले की, ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके पाठवले जात होते. ते बुलढाण्यातील शिंदे गटाच्यावतीने आयोजित ‘हिंदू गर्व गर्जना’ कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून सचिन वाझे हे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी रुपये पाठवत होते असा आरोपही खासदार प्रतापराव जाधव यांनी केला.

प्रतापराव जाधवांच्या या आरोपानंतर भाजपाचे नेते तथा भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर आरोप करत सचिन वाझे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते होते, हे कागदोपत्री स्पष्ट झालं आहे, असा गौप्यस्फोट केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलारांनी हे विधान केले.

प्रतापराव जाधवांनी केलेल्या आरोपांवर भाष्य करताना आशिष शेलार म्हणाले, सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते, हे स्पष्ट झालं आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे. सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात जेव्हा घेण्यात आलं, त्यावेळी कुणी दबाव टाकला होता? कुणी विशेष प्रयत्न केले होते? हेही न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. दोन्ही गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडल्या असून यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात दिसतोय. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे पाहता प्रतापराव जाधवांनी दिलेल्या माहितीला बळ मिळतंय, असे सांगायलाही शेलार विसरले नाहीत.

नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांच शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलं. यावेळी आयोजित हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाला शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी उपस्थिती लावली.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता तुरुंगात आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते, असा आरोप प्रतापराव जाधव यांनी केला होता.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची मागणी, कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करा आणि नुकसान भरपाई द्या प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्या, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *