राणेंचा आठवले होणार ? मंत्रिपदाच्या मागणीवरून राणेचे मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसमधील थंडा कर के खाव पध्दतीच्या राजकारणाला कंटाळून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वत:चा स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापना केली. मात्र आमदारकी आणि मंत्री पदाचे आश्वासन दिलेल्या भाजपकडून यातील एकही अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे आता राणे यांनी मंत्रिमंडळातील समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा अल्टीमेटम देण्याचे वक्तव्य केल्याने राणेंचा आठवले तर होणार नाही ना याबाबतच्या शक्यतांना राजकिय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी  देऊन  चार महिने उलटत आले असून माझी सहनशिलता संपण्याआधी निर्णय घ्यावा अशा स्पष्ट शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आज इशारा दिला. नाणार प्रकल्पातील शिवसेनेच्या भूमिकेची चिरफाड करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील इशारा दिला.

नाणार प्रकल्पासह अन्य विषयावरही मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. माझी सहनशीलता संपण्याआधी निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडणार असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले .

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नारायण राणे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला.  त्यानंतर  राणे यांना  भाजप कडून मंत्रिपदाची आशा  होती . मुख्यमंत्र्यांनीही राणे यांचा योग्य सन्मान केला जाईल असे आश्वासक वक्तव्य अनेकदा केले . मात्र  केले काहीच नाही.

युपीए सरकारच्या काळात केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन त्यावेळचे युपीएतील घटक पक्ष असलेल्या रिपाई (आठवले) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना देण्यात आले होते. मात्र युपीए सरकारचा १० वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी आठवले यांना मंत्री पद दिले नाही. त्यावेळी रामदास आठवले यांनी वारंवार मंत्रिपद द्यावी अशी मागणी प्रसार माध्यमातून केली होती. मात्र त्यांच्या तोंडाला अखेर पर्यत आश्वासनाचेच गाजर दाखविण्यात आले.

परंतु, राज्याच्या राजकारणात काँग्रेसने सुरुवातीला नारायण राणे यांना सुरुवातीला मुख्यमंत्र्याचे आश्वासन दिले होते. मात्र १५ वर्षाची राजवट संपली तरी त्यांना दिलेला शब्द काँग्रेस पूर्ण करू शकली नाही. त्यातच आता विरोधात असल्याने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत जाण्याआधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही राणे यांना आमदार किंवा खासदार पद आणि मंत्रीपदाचे आश्वासन दिले. त्यास आता ४ महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी त्यातील एका्ही आश्वासनाची पूर्तता भाजपकडून अद्याप करण्यात आली नाही. मात्र मला मंत्रिमंडळात घ्या असे सांगण्यासाठी नारायण राणे यांनी चार महिन्यात तीनवेळा पत्रकार परिषद घेतली. यावरूनच राणेंची आठवले होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याची खोचक प्रतिक्रिया काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *