मुंबई मेट्रो मार्ग ५ च्या सुधारित आराखड्याला राज्य शासनाची अंतिम मान्यता मिळाली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. विधिमंडळात आवाज उठवला आणि अखेर १८ हजार १३० कोटींच्या या महाप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. भिवंडीच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आमचा संघर्ष फळाला आला, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, भिवंडी हे लॉजिस्टीक हब आहे, मात्र राज्याचे मँचेस्टर असलेले भिवंडी रेल्वे मार्गावर नाही. येथील रस्त्यावर मोठा ताण असून रस्ते खराब आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्वाधिक गतीने वाढणारे हे शहर आहे. भिवंडी शहरातील सध्याची एकंदर वाहतूक परिस्थिती लक्षात घेता, अस्तित्वातील उड्डाणपूल पाडून मेट्रो मर्गीका बांधण्यास लागणारा विलंब लक्षात घेता या प्रकल्पात सुधारणा करण्याचे मागणी आम्ही सातत्याने लाऊन धरली होती.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत नगरविकास विभागाने बुधवारी मुंबई मेट्रो मार्ग ५ (टप्पा १, टप्पा २ आणि विस्तारीत टप्पा ३ ) अशा ३४ किमी लांब व १९ स्थानके असलेल्या १८ हजार १३० कोटीच्या सुधारित प्रकल्प आराखड्यास मान्यता दिल आहे. गेले पाच वर्षे रखडेला हा प्रकल्प आता गतीने पूर्णत्वास जाईल. भिवंडीच्या विकास आता गतीमान होईल. आम्ही विधिमंडळ व सरकार दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, या शब्दात आमदार रईस शेख यांनी समाधान व्यक्त केले.
Marathi e-Batmya