अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. अग्निसंस्काराच्या राख थंड होत नाही तोच तिसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला. हा शपथविधी करून घेण्यात आला यावरून टिकेची झोड उठली आहे. अजित पवारांच्या निधनाला ७२ तासही उलटत नाहीत, तोच सुनेत्रा पवारांनी अशाप्रकारे शपथ घेतल्याने यावर विरोधकांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना शह देण्यासाठी हा शपथविधी घडवून आणला, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरून शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले.
रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घडामोडीवर भाष्य करताना सुनिल तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. “अजितदादांच्या जाण्यानंतर शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनिल तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केले. दादांच्या चितेची राख देखील शांत झाली नव्हती, तोच तटकरेंनी वहिनींना (सुनेत्रा पवार) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. दहा दिवस पाळू दिले नाही पण त्यानंतर शपथविधी झाला असता तर काय बिघडलं असते? असा सवाल करून अजितदादांना सुनिल तटकरेंनी संपवलं असल्याचं वक्तव्य केलं आहे. राजकारणात जो माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, तो काहीही करू शकतो, शरद पवार पक्षाचा ताबा घेतील, या भीतीने तटकरेंनी ही ‘चालाख खेळी’ केल्याचा दावा कदमांनी केला. ज्या माउलीचे कुंकू आणि मंगळसूत्र गेले, त्यांना सुतकही पाळू दिले नाही मुंबईला आणून शपथविधी करायला लावणाऱ्या तटकरेंना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
महायुतीत दोन्ही पक्ष असूनही कदम यांनी टिका केल्याने महायुतीत वाद वाढण्याची शक्यता आहे.
ज्यांनी त्यांना मोठं केले, त्यांनाच संपवण्याचं काम ते करतात. माझ्या मुलाला (योगेश कदम) राजकारणात संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रामदास कदम यांनी तटकरेंवर विश्वासघात केल्याचा आरोप करताना जुन्या कुरघोड्यांची आठवण करून दिली. “लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंना खासदार करण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट केले. मात्र, विधानसभेच्या वेळी त्यांनीच आम्हाला दगा दिला. असा आरोपही कदमांनी केल्यामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे.
शिंदेसेनेचे नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हटले आहे की, शपथविधी लवकर कोणी करायला लावला, असे लोक विचारत आहेत. कोणाचा गैरसमज झाला असेल तर काही घेणं देणं नाही. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे की, लवकर शपथविधी होणं हे लोकांना आवडलेलं नाही अशी लोकभावना आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या हे आवडले नाही असे अजिबात नाही, पण इतक्या लवकर नको होतं. अर्थात समाधान आहे.त्या अदित पवार यांचा वारसा पुढे नेहतील असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
Marathi e-Batmya