केसरकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देतना नितेश राणे म्हणाले, हिंदूत्वासाठी सगळं.. प्रतीक पवार हल्ल्याची चौकशी 'एनआयए'कडे सोपवा-भाजपा आ. नितेश राणे यांची मागणी

नुकतेच एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाणीवपूर्वक शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र नितेश राणे यांनी दिपक केसरकर यांनी केलेल्या आरोपावर कोणतेच भाष्य न करता म्हणाले की, राज्यात बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे आणि कट्टर हिंदूत्ववादी नेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. हे हिंदूत्ववादी सरकार असणे महाराष्ट्राची गरज आहे. त्यामुळे हिंदूत्वासाठी सगळं माफ असे सांगत केसरकर यांच्या आरोपावर बोलण्याचे टाळले.

कर्जत तालुक्यातील (जि. नगर) प्रतीक पवार या युवकावर समाज माध्यमांतून नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे मुस्लिम युवकांनी केलेल्या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी शनिवारी केली.

या पद्धतीचे हल्ले या पुढील काळात सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी ४ ऑगस्टला अहमदनगर येथील कर्जत तालुक्यातील प्रतीक पवार या तरूणावर मुस्लिम तरूणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पवार हा युवक गंभीर जखमी झाला. या हल्ला प्रकरणी फरार आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी ही त्यांनी केली.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर उदयपूर, अमरावती व आता कर्जत येथे घडलेली ही तिसरी घटना आहे. हिंदूवर वारंवारं हल्ले केले जात आहेत. या पुढे हे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. धार्मिक भावना दुखावल्यावर घटनेचा जरूर निषेध करावास पण तो लोकशाही मार्गाने केला पाहिजे. शरीयत नुसार कायदा हाती घेऊन हिंदूंनां लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भाजपाने नुपूर शर्मा यांच्या त्या व्यक्तव्याचे समर्थन केले नाही. त्यांना पक्षातून निलंबित केले. हा विषय आता संपला असताना हिंदूवर असे हल्ले होत आहेत. हिंदु देव-देवतांची विंटबना केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या प्रत्येक वेळी आम्ही लोकशाही मार्गाने अशा घटनांचा निषेध केला आहे. राज्यात मविआ सरकार नसुन हिंदुत्व जपणारे सरकार आहे, तेव्हा अशा प्रकारे हल्ले करण्याचे प्रयत्न कोणी करू नये असे इशारा वजा आवाहनही त्यांनी यावेळी केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *