तिजोरीत खडखडाट असतानाही समृध्दी एक्सप्रेस वे ला १५ हजार कोटी द्या मुख्यमंत्र्यांचे वित्त विभागाला साकडे

मुंबई : गिरिराज सावंत

राज्यावरील वाढता कर्जाचा डोंगर आणि खर्चाचा ताळमेळ लागत नसताना विविध विकास कामांसाठी विकास निधी उभारणे जिकरीचे बनत चालले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी एक्सप्रेस प्रकल्पाला वित्तीय सहाय्य करण्यास कोणीही पुढे येत नाही.  त्यामुळे याप्रकल्पासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतूनच निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट वित्त विभागाला साकडे घातले असल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नागपूर ते मुंबई दरम्यान उभारण्यात येणार असलेल्या ४५ हजार कोटी रूपयांच्या समृध्दी एक्सप्रेस या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्रातील बँकाकडे विचारणा करण्यात आली. मात्र या प्रकल्पास वित्तीय पुरवठा करण्यास बँकांनी अुत्सुकता दाखविल्याने या निधी उभारणीसाठी म्हाडा, एसआरए, सिडको, एमएमआरडी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने आदेश दिले. या संस्थांकडूनही फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याने अखेर यासाठी पुन्हा एकदा बँकांची एक बैठक घेवून याबाबत पुन्हा विचारणा करण्यात आली. मात्र बँकाचा ननाचा पाढा कायम तसाच राहीला. त्यामुळे याप्रकल्पासाठी थेट राज्य सरकारच्या तिजोरीतून १५ हजार कोटी रूपये उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाला साकडे घातले असल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. त्यातच पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी २० हजार कोटी रूपयांची आर्थिक तरतूद पुरवणी मागण्यात करण्यात आली. मात्र निधीच उपलब्ध करता आला नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसेच जमा करता आले नाहीत. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा असेल तर यंदाच्या आर्थिक पुरवणी मागण्यांना कात्री लावावी लागणार असून विकास कामांच्या निधीतही मोठ्या प्रमाणावर घट करावी लागणार आहे. त्यामुळे यावेळी फक्त ५ ते ७ हजार कोटींच्याच पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात येणार असल्याचे वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो मार्गांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये सुरक्षित, जलद सार्वजनिक वाहतुकीस मोठी चालना २०३० पर्यंत ३०० किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन

राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी …

One comment

  1. मात्र या प्रकल्पास वित्तीय पुरवठा करण्यास बँकांनी अुत्सुकता दाखविल्याने?

    Should it not be utsukta dakhavali nasun?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *