शरद पवार यांची खोचक टीका,…पण कुणीही तडीपार झालं नाही अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य होतं की त्यापैकी कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हतं. तो प्रसंग कधी या राज्यकर्त्यांवर आला नाही. त्यामुळे गृह खातं आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रशासकांची आज मला आठवण होतेय असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आजचा दिवस संक्रातीचा आहे. तुम्हाला संक्रातीच्या शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या हातात लेखणी असते. त्यामुळे रोज तुम्हाला सांगायची गरज नाही. फक्त तुमची लेखणी आमच्यासाठी ठेवा एवढंच सांगायचं आहे, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, या देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी आणि सर्व देशाचं राज्यांना एकत्रित करण्याचं काम सरदार पटेल यांनी केलं. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी देशाचं गृहमंत्री म्हणून सर्वांनी अनुभवलं. महाराष्ट्राचं योगदान होतं. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचं गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. आपलं शेजारचं गुजरात महाराष्ट्र हे एक राज्य होतं. गुजरातनेही अत्यंत उत्तम प्रकारची ओळख देशाला करून दिली. बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवराव सोळंकी आणि चिमणभाई पटेल आदी उत्तम प्रशासक होते. ही नावं सांगितली यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीफार माहिती घेऊन भाषण केली तर लोकांच्या मनात शंकेची स्थिती निर्माण होत नाही असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, उदाहरण सांगायचं म्हणजे भूजला भूकंप झाला. मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधानांनी बोलावली. त्यात एक प्रश्न निर्माण झाला. ही संकटे येत आहेत. अतिवृष्टी आणि महापूर, भूकंपाचं धोरण ठरवलं पाहिजे. त्यासाठी वाजपेयी यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपाच्या नेत्याकडे होती. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केलं. मी आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केलं त्यावर न बोललं बरं. मराठीत एक म्हण आहे कुठे कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी अशी म्हण आहे, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

दरम्यान, सद्यस्थितीत विरोधकांकडून संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर मस्साजोगला सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलो होतो. तेथील परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर तेथील जनमाणसाची भूमिका मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. मात्र या प्रकरणात ज्या मंत्र्याचे नाव पुढे येत आहे त्याच्या मंत्री पदाबाबत प्रमुखांनी निर्णय घ्यावा असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस इशारा दिला.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *