आदित्य ठाकरे म्हणाले, अयोध्येत महाराष्ट्र सदन… मनसेवर अप्रत्यक्ष टीका

बहुचर्चित शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा दुसऱ्यांदा ठरल्याप्रमाणे आज पडला. यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ५ जून रोजीचा अयोध्या दौरा जाहिर केल्यानंतर शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहिर कऱण्यात आला. मात्र भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्या विरोधानंतर राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आपल्या अयोध्या दौरा १० ऐवजी १५ जून रोजी करणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार आज अयोध्येत आदित्य ठाकरे हे दुपारी पोहोचले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा विचार असून त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वतः पत्र व्यवहार आणि चर्चा करणार असून हे महाराष्ट्र सदन किमान १०० खोल्यांचे उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.

ही आमची तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही, इथे राजकारण करायला आलेलो नाही, दर्शन घ्यायला आल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस शिवसेना नेते संजय राऊत, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची देखील उपस्थिती होते.

या तीन-चार वर्षाच्या काळात शिवसेना परिवारासोबत अयोध्येत चौथ्यांदा येत आहे. परंतु उत्साह, जल्लोष तसाच आहे आणि आता तर आपण बघत असाल, की मंदिर निर्माण होत असताना अजून उत्साहाने अनेक शिवसैनिक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा अन्य राज्यांमधून हे अयोध्येत आलेले आहेत. रामजन्मभूमीत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. मी सर्व माध्यमांना हीच विनंती करतो की, आमच्यासोबत जो उत्साह, जल्लोष आहे त्याचं देखील थोडं चित्रीकरण करावं आणि देशाला दाखवाव. कारण, हा एक वेगळा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

२०१८ मध्ये मी सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलो होतो आणि तेव्हा त्यांनी घोषणा केली होती, की पहले मंदिर फिर सरकार.. योगायोगाने जेव्हा आम्ही नोव्हेंबर २०१८ मध्ये आलेलो ती घोषणा झाल्यानंतर, कदाचित असं नव्याने घडून आलं की त्यानंतरच न्यायालयीन प्रक्रियेला चालना मिळाली आणि एक वर्षात बरोबर न्यायालयाचा निकाल आला. न्यायालयाच्या निकालामुळे आज इथे मंदिर निर्माण होत आहे. आम्ही न्यायालयाचे तर आभार मानतच आहोत, पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे, की आज इथे दर्शन तर घ्यायला आलेलोच आहोत. आपल्या मनात कदाचित प्रश्न असतीलच पण त्याचं एकच उत्तर आहे, हे जे काही आमचं आजचं इथे येणं आहे, ही आमची तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही. इथे राजकारण करायला आलेलो नाही, दर्शन घ्यायला आलेलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाची गोष्ट म्हणजे आज इथे आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलेलं आहे, की ते स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहेत. पत्रव्यवहार करणार आहेत आणि या अयोध्येत या पावनभूमीत महाराष्ट्र सदनासाठी देखील जागा मागणार आहेत. साधारणपणे १०० खोल्यांचं किंवा जास्त जमले असं महाराष्ट्र सदन आम्हाला इथे बनवायचं आहे. महाराष्ट्रातून इथे अनेक भाविक येत असतात. त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा इथे निर्माण करायची असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मंगलप्रभात लोढा यांचा विश्वास, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होणार उद्योगांना उपयुक्त ठरणारी देशातील पहिली 'ए आय लिव्हिंग लॅब' महाराष्ट्रात सुरु

उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातील पहिली ‘ए आय  लिव्हिंग लॅब” महाराष्ट्रात सुरु करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *