मराठी ई-बातम्या टीम
काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्या विरोधातील अनेक कागदपत्रे भाजपाचे माजी खा.किरीट सोमय्या यांना पोहोचविल्याची आणि रामदास कदम सोमय्या यांच्यातील चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रामदास कदम यांनी त्यासंदर्भात आपले मौन सोडत मी कधीही किरीट सोमय्या यांना भेटलो नाही कि त्यांनी त्यांच्याशी बोललो नाही. पण मी गद्दार नाही तर अनिल परब हेच शिवसेनेचे गद्दार नेते असल्याचा आरोप रामदास कदम यांनी करत शिवसेनेत एकच खळबळ निर्माण केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे आणि अजित पवार यांनी दिलेल्या सरकारी पैशातून शिवसेनेच्या ताब्यात असलेला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचे काम अनिल परब हे करत आहेत. वास्तविक पाहता तो मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात अनेक वर्षापासून आहे. मात्र आता तो राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मिलिद नार्वेकर यांचा अनधिकृत असलेला बंगला त्यांनीच पाडला. त्याची कोणतीही कागदपत्रे मी कोणाला दिलेली नाहीत. अनिल परब यांनी कोकणात हॉटेल्स बांधली, बंगले बांधले. पण त्यावर जर काही बोललो तर शिवसेनेच्या विरोधात बोलला असे सगळं सुरु आहे. अनिल परब म्हणजे शिवसेना आहे असे असेल तर आम्ही कायमचं घरी बसू मग काही इलाज नाही. आणि अनिल परब म्हणजेच पक्ष असेल तर रामदास कदमचं पक्षासाठी योगदान म्हणजे काहीच नाही अशी भूमिका कोणी घेतली तर मग त्याला कोण काही करू शकतं असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेना वाढविण्यासाठी मी जेव्हा संघर्ष करत होतो त्यावेळी अनिल परब कुठे होता असा उपरोधिक सवाल करत शिवसेनेची नगरपरिषद स्थानिक आमदाराला बाजूला सारत गद्दारांना हाताशी धरून राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघालेला अनिल परब हा गद्दार आहे. घोषणा द्यायच्या असतील त्या अनिल परब याच्या विरोधात द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
करत रत्नागिरीचा पालक मंत्री म्हणून नियुक्त केल्यापासून अनिल परब हे फक्त वर्षातील १५ ऑगस्ट आणि २६ या दोनच दिवशी जिल्ह्यात येतात. त्यांना येथील शहरप्रमुख, विभागप्रमुख कोण माहित नाही. त्यांना या गोष्टी बघायला वेळच नसल्याचा आरोप करत एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पण याला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही. मात्र रामदास कदमाच्या मुलाला संपवायला याच्याकडे तीन-तीन दिवस दापोलीत ठाण मांडून बसायला वेळ आहे. हे निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
तुमची वैयक्तीक मालमत्ता म्हणजे शिवसेना नाही. तुमच्या हॉटेलवर बोललो म्हणजे ती काही शिवसेनेची मालमत्ता नाही. मी शिवसेनेवर बोललो नाही. उगाच माझ्यावर गद्दारीचा शिक्का लावू नका मी कडवा शिवसेनेच्या भगव्याचा शिपाई आहे. मी कधीच स्वत:ला डाग लावून घेतला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मी उध्दव ठाकरे यांना एक लिहिले असून ते पत्र आपण आज सार्वजनिक करत आहे. तसेच माझी ठाकरे यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी याप्रकरणात लक्ष घालावे. अनिल परबाच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याचे पाय जमिनीवर नाहीत. त्याचे पाय पुन्हा जमिनीवर आणा. उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मी अनिल परबना हरामखोर म्हटले आहे. त्या हरामखोराला थांबवा, त्याला शिवसेना वाढविण्यासाठी मंत्रिपद दिले नेत्यांना संपविण्यासाठी नाही असे त्यात मी माझ्या भावना व्यक्त केल्या असून अन्याय सहन करायचा तर किती सहन करायचा अशी भूमिकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
त्यांनी केलेल्या या आरोपानंतर शिवसेना सोडणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला असता ते म्हणाले की, मी शिवसेना सोडणार नाही. परंतु माझ्या मुलांना त्यांच्या राजकिय भवितव्यासाठी काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याबाबत मी काही बोलणार नाही. यासंदर्भात एक महिन्यानंतर आम्ही आमची पुढील भूमिका ठरवू असेही त्यांनी स्पष्ट केले.
Marathi e-Batmya