उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांना इशारा, अश्रुंची किंमत मोजावीच लागणार महिला रणरागिनींच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी दिला इशारा

मागील २४-२५ वर्षापासून ज्यांच्या विरोधात आपण लढत होतो. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखविला. तर ज्यांना सोबत घेवून आपण पुढे निघालो तो आज आपला एक नंबरचा शत्रु निघाला असून तर ज्यांच्या जीवावर आपण पुढे निघालो होतो त्यांनी तर पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका करत त्यांच्या खंजीर खुपसण्यामुळे ज्या शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रु आले, त्या अश्रुंची किंमत बंडखोरांना मोजावीच लागणार असल्याचा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला.

शिवसेना भवनात शिवसेनेच्या रणरागिनींच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उध्दव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.

काल राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष अधिवेशनानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरील माईक खेचून घेतला. त्या घटनेचा संदर्भ देत उध्दव ठाकरे म्हणाले, काल फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या समोरील माईक खेचून घेतला. भविष्यकाळात ते आणखी काय काय खेचून घेतील सांगता येत नाही असा खोचक टोलाही लगावला.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक जण सांगत होते, काँग्रेस काय करते ते बघा, राष्ट्रवादी काँग्रेस काय करते बघा असे सांगत होते. मात्र शेवटपर्यत या साऱ्यांनी आपल्यावर विश्वास दाखविला. परंतु ज्यांच्या जीवावर विश्वास ठेवून आपण पुढे चाललो होतो. त्यांनी मात्र काय केले ते आपण पाहिले. मला बंडखोर आणि निष्ठावान यांच्यातील मध्ये काढून निष्ठावंताना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. अशा निष्ठावानांवरच शिवसेना आज उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेच्या एका महिला रणरागिनीने या मेळाव्यात, जे गेले ते कावळे, जे राहिले ते मावळे असल्याचे सांगत कोण तो गेला त्याला आम्ही मोजत नाही. त्यामुळे साहेब तुम्ही काळजी करू नका एक पुरूष फक्त एका पुरूषापर्यत पोहोचतो. मात्र एक महिला शंभर महिलांच्या चुली पर्यत पोहोचते. याच पध्दतीने आगामी निवडणूकीत त्या गेलेल्या कावळ्यांना धडा आम्ही शिकवू असा विश्वासही या महिला रणरागिनीने उध्दव ठाकरे यांना दिला.

दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्या या इशाऱ्यावर शिक्षाच्या गतीपुढे मर्सिडेजचा स्पीड फिका पडला असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

About Editor

Check Also

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम पारदर्शक व निष्पक्षपणे राबवावी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *