अखेर या गोष्टीसाठी मुंडे भाऊ-बहिण आले एकत्र मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्याने वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

बीड जिल्ह्यातील राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीने जिल्ह्यातील राजकारणात प्रथमच एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहिर झाल्यानंतर पुन्हा बहिण-भावामध्ये कोण बाजी मारणार अशी चर्चा सुरु असतानाच अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंसह बिनविरोध निवडून आलेल्या २१ संचालकांची नांवे आज जाहीर केली. दरम्यान, राजकारण न आणता कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही व आ. धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला व सकारात्मक पायंडा यातून पडेल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील राजकारणात धनंजय मुंडे विरुद्ध पकजा मुंडे यांच्यातील राजकिय वैमनस्य सर्वश्रुत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोघेही सोडत नाही. मात्र दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोघेही प्रथमच एकत्र आले आणि ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्यास या दोघांनाही यश आले आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित २१ संचालक बिनविरोध विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. कारखान्याचं हित महत्वाचं म्हणूनच बिनविरोध निवडीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मोठया कष्टातून आणि मेहनतीनं वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला, पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीतून जात आहे. आताच्या हया परिस्थितीत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचं हित पाहणं महत्वाचं होतं म्हणून आम्ही व आ. धनंजय मुंडे यांनी मिळून बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला. यातून चांगला व सकारात्मक पायंडा पडेल असा विश्वास विद्यमान अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

ऊस उत्पादक सभासद आणि नवनिर्वाचित संचालकांचं सहकार्य यासाठी लाभणार आहे ते निश्चित मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे संचालक बिनविरोध
पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या गटाचे बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे
पांगरी गट – श्रीहरी मुंडे, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे,
नाथरा गट – सतीश मुंडे, राजेश गिते, अजय मुंडे
परळी गट – पांडूरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक,
सिरसाळा गट – सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतु कराड,
धर्मापूरी गट – शिवाजीराव गुट्टे, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे,
सहकारी संस्था मतदारसंघ – सत्यभामा उत्तमराव आघाव,
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी – मंचक घोबाळे,
महिला प्रतिनिधी – पंकजा मुंडे, ॲड. यशःश्री मुंडे,
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – केशव माळी,
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी – वाल्मिक कराड

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *