जयंत पाटील म्हणाले, सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला हे आता स्पष्ट

ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले याचा अर्थ सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी त्यांना कुणी फुस लावली होती हे लक्षात येते असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्यावेळी १०५ एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला होता. या सर्व कर्मचाऱ्यांना अटकही करण्यात आली होती. तसेच यांची ओळखही पटविण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांसह ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एसटी महामंडळाला दिले. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी वरील टीका केली.

जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना आपले भूमिका स्पष्ट केली.

आई-वडिलांना शिव्या देणे अत्यंत चुकीचे आहे. मराठी माणसे असे कधीही करत नाहीत. चंद्रकांत पाटील यांना आई-वडिलांना शिव्या द्या असे सांगणे हे योग्य आहे असे मला वाटत नाही. मोदी – शहांची तुलना आई-वडिलांशी करणे हे तर अत्यंत चुकीचे आहे, हे हिंदू संस्कृतीमध्ये बसत नाही असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू होती त्या प्रकरणात नेमके काय समोर आले आहे आणि क्लोजर रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे, हे पाहिल्याशिवाय त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. जर क्लीनचीट दिली असेल तर त्यामध्ये त्याची कारणे लिहिली असतील असेही ते म्हणाले.

आमदार वैभव नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी करण्यात आल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही ते निष्ठावंत आहेत. कदाचित त्यांनी साथ सोडावी यासाठी दबाव आणला जात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूका जवळ आल्या की, अशी काही विधाने करायची आणि त्या वर्गाला चुचकारायचं अशी स्ट्रॅटेजी काही जणांची असू शकते. मी मोहन भागवत यांच्याबाबत बोलत नाहीत. मात्र मधल्या काळात ते मुस्लिम धर्मगुरूंना देखील भेटले होते असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या सभेने खरी शिवसेना कुणाची हे स्पष्ट झाले आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचेच आहे. जर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिले तर त्यांच्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केले जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

शिंदे गटाच्या सभेला एवढा खर्च करण्यात आला. लोकांना अक्षरशः कोंबून मुंबईला आणले त्यांना माहिती देखील नव्हती असे सांगतानाच या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *