राष्ट्रवादीचे काँग्रेस (अप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदर सुनील तटकरे यांनी ठाकरे शिवसेनेवर बाळा माने प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सेना कोकणात दोन अंकी संख्या गाठण्यात अपयशी ठरली आहे. त्या ठिकाणी आता उद्धव सेनेचे काहीच प्राबल्य नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊतांनी अगोदर त्याचे आत्मपरीक्षण करावे आणि मग पैसे वाटल्याचा आरोप करावा असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला.
सुनिल तटकरे यांनी ठाकरे सेनेचे नेते विनायक राऊत यांनी बाळा माने यांच्यावर जोरदार टीका केली. २५ कोटी रुपये घेऊन उमेदवारी मागे घेतल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला. त्यावर खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत तोंडसुख घेतले. विनायक राऊत हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलले असे तटकरे म्हणाले. आपल्या पक्षाचं कोकणात काय स्थान राहिलं हे दूर्बिण घेऊन संजय राऊतांनी शोधावं असा टोला लगावत एकेकाळी कोकण हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला होता. तो बालेकिल्ला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहिलेला नाही. त्यांना दोन अंकी सुद्धा आकडा गाठता आला नाही. तर कोकणात महायुतीचा भक्कम बालेकिल्ला झाला आहे. तुमचे मोजून मतदार ४५ आहेत, अशावेळी दुसऱ्यांवरती ठपका ठेवण्यापेक्षा खासदार म्हणून तुम्ही अपयशी का झालात, याचे आत्मपरीक्षण करावे असा खोचक टोला विनायक राऊत यांना लगावला.
राष्टवादी (शप) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. अशोक खरात सोबत सुनिल तटकरे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्याचा त्यात उल्लेख आहे. तर एकाच घरात तीन तीन पदं देण्यात आल्याची टिका आमदार पवार यांनी केली. यावर प्रत्युत्तर देताना सुनिल तटकरे म्हणाले, मी निवडून आलेला खासदार आहे. माझ्याकडे असंच पद आलेले नाही. परिश्रमातून, स्वतःच्या ताकदीवर, जनतेच्या पाठिंब्याने मी निवडून आलो आहे. पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलो. आदिती तटकरे दोनदा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. मी कधीच कामाख्या देवीला कुणासोबत गेलेलो नसल्याचे सांगत माझे यश ज्यांना पाहवत नाही ,त्यांची दुर्दशा जनतेने केली असल्याचा पलटवारही यावेळी रोहित पवार यांच्यावर केला.
शेवटी बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, कोणतीही आघाडी किंवा पक्ष संपुष्टात येत नसतो. राजकिय पक्षात चढ उतार होत असतात. पण नरेंद्र मोदी द्वेषाची कावीळ होते तेंव्हा ते एकत्र आले. त्यानंतर त्यांची जी शकलं व्हायची ती होतात. जनता सगळे पाहते आहे. विचार स्वातंत्र्य आहे सगळ्यांना आपल्या देशात असे अनेक राजकिय पक्ष आपण पाहिले नसल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya