सुप्रिया सुळे यांचा आरोप, सातत्याने क्राइम वाढतोय, लोकांना वर्दीची भिती नाही पुणे आणि बीडमधील परिस्थिती सारखीच

महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येला जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आहे. महादेव मुंडे यांच्या हत्याच्या तपासाकरिता उशिरा का होईना राज्य सरकारच्या वतीने एसआयटीची स्थापना करण्यात आली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सातत्याने महादेव मुंडे यांच्या हत्येची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करत आहे. मागील आठवड्यात महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्घृणपणे हत्या करण्यात आली या संदर्भात लोकसभेमध्ये मी बोलले होते. मात्र आता राज्य सरकारने महादेव मुंडे यांच्या पत्नीच्या भेटीनंतर एसआयटीची स्थापन केली आहे. ही एसआयटीच्या मार्फत करण्यात येणाऱ्या तपास पारदर्शक व्हावा अशी माझी सरकारला विनंती असेही यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा झालीय. आता बिहारमध्ये निवडणूक आयोग जे निर्णय घेतय. नाव कमी जास्त वाढवली जात आहेत. त्यात पारदर्शकता नाहीय असं सगळ्याचे पक्षाचे लोक बिहारमधले म्हणतात. बिहार निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक प्रश्न उदभवले आहेत. त्यावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी. कराभार पारदर्शक व्हावा. ही सशक्त लोकशाही आहे. हा देश कोणाच्या मनमानीने चालणार नाही. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हा देश चालणार असल्याचेही सांगितले.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, लाडकी बहिण योजनेत ४९०० कोटींचा भ्रष्टाचार. एवढा मोठा जनादेश सरकारला मिळाला आहे. त्यांचे मंत्री आणि वाचाळवीर असतील. सत्ता आणि पैसा आल्यावर गाडी कशी चुकीच्या ट्रॅकवर जाते, याचं देशातलं सर्वात दुर्देवी उदहारण म्हणजे आजच महाराष्ट्रातल सरकारचं आहे असेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी म्हटलय पुण्यात दादागिरी वाढली असल्याचे वक्तव्य केले त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गुंतवणूक येत नाहीय, हे कबूल केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. याच्यामागे कोण आहे? कोण या कंत्राटदारांच्या मागे आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना वाटत असेल पुण्यात दादागिरी होतेय, त्यामुळे पुण्यात गुंतवणूक येणार नाही, तर मला मुख्यमंत्र्यांना विचारायाचय तुम्ही काय कारवाई केली? तुम्हाला माहितीय इथे दादागिरी होतेय, गुंतवणूक येत नाहीय, याला जबाबदार कोण? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे असे आवाहनही यावेळी केले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये काल दोन गटात तणाव निर्माण झाला होता. ही दुर्देवी घटना आहे. दौंड एक सुसंस्कृत, संवेदनशील तालुका आहे. आमचं भाग्य आहे, आम्हाला दौंड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या भागातील सगळ्या लोकांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. काल मी स्थानिक आमदार राहुल कुल आणि एसपींशी बोलली. राहुल कुल यांच्यासोबत राजकीय मतभेद असतील, पण सशक्त लोकशाहीत चर्चा झाली पाहिजे. राहुल कुल आणि मी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सहकार्याची भावना दाखवल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दौंड येथील माझे तिथले सहकारी अप्पासाहेब पवार, सोहेलभाई खान तिथे जाऊन आले. कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक यांच्याशी घरगुती चर्चा झाली. आम्ही दौंडमध्ये गुण्यागोविंदाने राहतो. अनेक दशकं राहतोय. दौंडमध्ये असं कधी झालं नाही, होऊ देणार नाही. बाहेरुन येऊन आमच्या भागात कोणी गडबड करणार असेल तर त्याचा निषेध करते. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ही पहिली वेळ नाहीय. तुमच्या लोकांना आवरा. दौंडमध्ये येऊन भाषण करुन गडबड करतात, असं मी म्हणत नाहीय, पण तिथला ग्राऊंड रिपोर्ट असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांना, मला सुद्धा दौंडने खूप दिलय. माझी अजितदादांना विनम्र वनंती आहे, तुम्ही पालकमंत्री आहात. दौंडने तुम्हाला खूप प्रेम दिलय. आपल्या दौंड तालुक्यात असं काही होणार नाही. बाहेरुन येऊन लोक भडक भाषण करत असतील, टीकाटिप्पणी करत असतील, तर त्यांना आवरा असं आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश, ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारणीस गती द्या; गुणवत्तेत तडजोड नको डॉ बाबासाहेब बेडकर यांचा ७५ फुटाचा पुतळा उभारणार

लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ (Statue of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *