सुप्रिया सुळेंच्या पुढाकाराने राष्ट्रवादीची अजित पवारांना वाढदिनाची अशीही भेट कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी राष्ट्रवादीची 'राष्ट्रवादी जीवलग' योजना - खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनामुळे अनेक मुलांना आपल्या पालकांना गमावावे लागले अशा ४५० मुलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही अभिनव योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज दिल्ली येथून फेसबुक लाईव्हवरुन करत आपले बंधु अजित पवार यांना एक आगळी-वेगळी वाढदिनाची भेट दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून राज्यात अनाथ झालेल्या ४५० मुलांसाठी प्रेमाचा आधार म्हणून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा हा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील एक सहकारी असे ४५० जण या ४५० कुटुंबांशी म्हणजे त्या मुलांशी जोडले जाणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी दूत’ निर्माण केला असून यामध्ये मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर मुलांसाठी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता जोडला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

‘राष्ट्रवादी दूत’ या ४५० अनाथ मुलांच्या घरात जाईल. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाकडे देणार आहे. शिवाय या अनाथ मुलांची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे तो डाटाही जमा केला जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम व पारदर्शक कारभार केला जाणार आहे. शिवाय यांची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाईटवर व स्वतः माझ्या पेजवर उपलब्ध राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.

या अनाथ मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार असून आज दिल्लीतून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या योजनेची घोषणा करताना या योजनेची संकल्पना अंमलात आणणार्‍या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतानाच अजित पवारांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छाही दिल्या.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा आरोप, महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या मध्ये पहिला तर महिला अत्याचार मध्ये देशात दुसरा देशात १७ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे

नुकताच एनसीआरबीचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालातील आकडेवारी महाराष्ट्रासाठी काही अनुकूल नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *