पाकिस्तानची हिम्मत होणार नाही इतकी कठोर कारवाई करा भारतीय हवाई दलाच्या जवानांनो भले शाब्बास! : खा. अशोक चव्हाण

मुंबईः प्रतिनिधी

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून बेधडक हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. ही प्रत्येक भारतीयासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. भारतीय सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे. या असामान्य शौर्याचे कौतुक करण्याकरिता शब्द अपुरे आहेत. परंतु हृदयातून भले शाब्बास हे उद्गार आपसूकच बाहेर पडत आहेत. अशा भावनातूर शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी भारतीय हवाईदलाचे अभिनंदन केले आहे.

भारतीय हवाईदलाने केवळ हल्लाच केला नाही तर पाकिस्तानाच्या डोळ्यासमोर दहशतवादी तळ उद्धवस्त करून सुखरूप परत आले. ही अतिशय नेत्रदिपक कामगिरी आहे. या कारवाईतून पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतीय सामर्थ्याचे दर्शन झाले असेलच. १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानचा फक्त पराभवच तर विभाजन करून बांग्लादेशाची निर्मिती केली. पाकिस्तानचे ९१ हजार सैनिक त्यावेळी भारतीय सैन्यापुढे शरण आले होते.  भारतीय सैन्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे पाकिस्तानला तसाच धडा शिकवण्याची वेळ आल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दहशतवाद्यांचा म्होरक्या मसूद अझहरचा खात्मा करून पुन्हा दहशतवाद्यांना आश्रय देण्याची हिम्मत पाकिस्तानला होता कामा नये इतकी कठोर कारवाई करावी आणि पाकिस्तानला नेस्तनाबूत करावे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

जयकुमार रावल यांची माहिती, गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला चालना

महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यास नवी दिशा देणारा आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला चालना देणारा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *