Breaking News

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारकडून वेतनासाठी पैसे महाविकास आघाडीच्या काळातील भाजपाचे नेते मात्र गायब

मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे थकित पगारीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुन्हा एकदा संपाचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला. त्यानंतर परभणीतील एका एसटी कर्मचाऱ्यांने पगार न मिळाल्याने भेडसावत असलेल्या आर्थिक तंगीमुळे अखेर काल आत्महत्या केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अखेर २५० कोटी रूपये एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देत असल्याचे जाहिर करत त्याविषयीचा शासन निर्णयही जारी केला. दरम्यान याच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडणारे भाजपाचे नेते मात्र चिडीचुप असल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन छेडून सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला होता. त्यावेळी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाचा मुद्या आणि पगारवाढ यासारख्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला आणि शरद पवार यांच्या घरावरही आंदोलक चालून गेले होते. त्यामुळे आता नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकार तरी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडवले जाणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन छेडून मविआला जेरीस आणले होते. त्यामुळे आता या एसटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही आता या तीन नेत्यांना सवाल करण्यात येत आहे.
त्यासंदर्भात आज गुणरत्न सदावर्ते यांच्याबरोबर संवाद साधताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर विश्वास व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वासही सदावर्ते यांनी व्यक्त केला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याविषयी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांवर ठपका ठेऊन आणि ठाकरे सरकारच्या काळात कोणत्याही तरतूदी करुन ठेवल्या गेल्या नसल्यानेच आजची परिस्थिती आली असल्याचे मत सदावर्ते यांनी स्पष्ट केले.

तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भातीही त्यांनी माहिती दिली. तर सांगली एसटी कर्मचारी आत्महत्याप्रकरणी फायनन्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी मनोज सोनिक व महामंडळांमधील गायकवाड नावाचे अधिकारी या दोघांची चौकशी लावणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे सरकार यांनी या अगोदर यासंदर्भातील कोणत्याही तरतुदी करून ठेवल्या नव्हत्या असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर ठपका ठेवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत