भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे, या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात अन्यत्र प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी यासाठी विभागाने पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
मंत्रालयात महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भिक्षेकरी पुर्नवसन प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड उपस्थित होते.
मंत्री कु.अदिती तटकरे म्हणाल्या की, भिक्षेकरी समाज बांधवांना सन्मानाने जगता यावे, कष्टाची भाकरी मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे विविध विभागांच्या सहकार्याने सुरू असलेला हा प्रकल्प, शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राज्यात इतर ठिकाणी देखील भिक्षेकरी गृह आहेत. त्या भागाचाही विकास होण्याकरिता महिला व बालविकास विभागाने सर्वसमावेशक अभ्यास करावा आणि नव्याने काही भागांचा देखील यामध्ये समावेश करता येईल का याबाबत पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही मंत्री कु. तटकरे यांनी दिले.
Marathi e-Batmya