राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येवून एक महिना झाला. तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मात्र तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना टोला लगावला. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, उद्या कॅबिनेटची बैठक आहे ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे असा खोचक टोला लगावला.
तुम्ही विचार करा ना, त्या कॅबिनेटमध्ये ४५ खुर्च्या असतात त्या टेबलभोवती. त्याच्यात ते दोघे पूर्णपणे चर्चा करतात. बाकीच्या सगळ्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, हे दोघं काय करता काय नाही, असं म्हणत हसून टाळी वाजवली. तसेच पुढे बोलताना म्हणाले, त्याच्यामुळे त्यांच्यावर एवढं टेन्शन असतं खाली खुर्च्यांचं. आपण चुकू नये बरं का दोघं चुकू नये… अशी उपहासात्मक टीपण्णी त्यांनी केली. एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळ विस्तार नाही. त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही, की त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने होत नाही असा चिमटाही त्यांनी दोघांच्या सरकारला काढला.
मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्री यांना खातंच दिलेलं नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहेत. मात्र सहीअभावी फाईली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्री यांना अधिकारच दिलेला नाही. राज्य सरकारचे अधिकार गतीने व्हायला हवे व जनतेची कामे झाली पाहिजेत हीच आमची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. याबाबत राज्य सरकार काय पाऊले उचलणार आहे हे सांगायला तयार नाही. निर्मला सीतारामण या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे स्टेटमेंट वाचले. मात्र सर्वसामान्य गृहिणीला विचारले तर किती महागाई वाढली आहे हे लक्षात येईल. तेलाच्या किमती कमी आहेत हे मान्य करायला हवे. परंतु इतर वस्तूंच्या किंमती कमी झालेल्या नाहीत. २०१६ मध्ये नोटबंदी झाली त्यावेळी कॅशलेसचा आभास निर्माण केला गेला व काळा पैसा बाहेर येईल असे सांगण्यात आले परंतु तसे झाले नाही. अद्याप आरबीआयने किती नकली नोटा मिळाल्या हे सांगितलेले नाही. दोन हजारच्या नोटा डम्प करण्यात आल्या आहेत अशी चर्चा आहे. ते शोधण्याचे काम केंद्रीय यंत्रणांनी करावे असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले.
कुणी कितीही काही म्हटले तरी जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे असेही अजित पवार यांनी जेपी नड्डा यांच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.