लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात मुंबईतील लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी उष्णतेची लाट असतानाही मतदान केंद्रांवर अंत्यत धिम्या गतीने मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. त्यामुळे संध्याकाळपर्यंत ४८ टक्क्याच्या जवळपास मतदानाची आकडेवारी पुढे आली. त्यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या हेतू बद्दल शंका घेत केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. त्या विरोधात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.
२० मे रोजी मुंबईत पार पडत असलेल्या मतदानाला केंद्रीय निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप करत असून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक धिम्या गतीने मतदानाची प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. तसेच संध्याकाळी ६ वाजण्या पूर्वी सर्व मतदारांनी मतदान केंद्राच्या आत जावे आणि पहाट झाली तरी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन मतदारांना केले.
मतदानाची प्रक्रिया सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या विरोधात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी हरकत घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगानेही आशिष शेलार यांनी केलेली तक्रारीचा अर्ज तसाच नवी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला. त्यावर काल केंद्रीय निवडणूक आयोगाना उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील अर्जावर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले.