मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कामगिरी बजावत असताना कोरोना काळात झालेल्या घोटाळ्या प्रकरणी तत्कालीन पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना चौकशीसाठी ईडीने बोलावणे होते. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले होते. परंतु दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळख मिळविलेले आयएएस अधिकारी इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव पदावरून राज्याच्या गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदी आज बदली करण्यात आली. तसेच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे असलेला कार्यभारही काढून घेण्यात आला.
बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर इक्बाल सिंह चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजकिय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर, जिल्ह्यात किंवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. या आदेशानुसार चहल यांची बदली करण्यात आली होती. आता त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देखील चहल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीची ऑर्डर