प्रताप सरनाईक यांचे निर्देश, मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढा आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजनेसह विविध मागण्यांवर चर्चा

मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्यात यावा, तसेच प्रलंबित विषयांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.

बैठकीत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी विभागाच्या आकृतीबंधाची तातडीने अंमलबजावणी, विविध संवर्गांसाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करणे, पदोन्नती प्रक्रियेला गती देणे तसेच आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्याबाबतच्या मागण्या मांडल्या. या सर्व विषयांवर शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करून निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, संघटनेने सर्व संवर्गांसाठी सेवा प्रवेश नियम तयार करण्याची मागणी केली. विशेषतः वर्ग-२ प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच वर्ग-३ संवर्गातील पदांसाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. विभागाचे कामकाज अधिक प्रभावी आणि सुरळीत होण्यासाठी ही प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच वरिष्ठ लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक पदावरील पात्र कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.

प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, याशिवाय, प्रतिनियुक्ती रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी बदलीचा प्रश्न, प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांना बदली कायदा २००५ लागू करण्याची मागणी; तसेच अन्य प्रलंबित प्रशासकीय विषयांवरही संघटनेने सविस्तर मांडणी केली. त्यावर सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर आयुक्त भरत कळसकर, सह आयुक्त संजय मैत्रेवार, सह आयुक्त रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कर्जमाफी निव्वळ धुळफेक, ५० % पेक्षा जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार फडणवीस सरकारने आधी ८० लाख लाडक्या बहिणींना निकष लावून अपात्र ठरवले, आता शेतकऱ्यांचीही नियम लावून घोर फसवणूक

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना हा निव्वळ देखावा आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *