मुंबईः प्रतिनिधी
एलएलबी विभागाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परिक्षेचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने जाहिर केला. मात्र एलएलबीच्या पाचव्या सेमिस्टरच्या तब्बल ३४ विद्यार्थ्यांना परिक्षा देवूनही त्यांना मुंबई विद्यापीठाने गैरहजर असल्याचे दाखवित नापास केले आहे. याबाबत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ आणि सिध्दार्थ कॉलेजच्या प्रिंसिपल संध्या डोके यांच्याकडे तक्रार केली. तरी यावर अद्याप कोणतेही ठाम उत्तर मिळाले नसल्याने सदर विद्यार्थ्यांच्या नापास होण्यास कोण जबाबदार? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर पर्याय म्हणून विद्यापीठ नियोजन आयोग अर्थात युजीसीच्या आदेशनान्वये, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाच्या आक्रमक पवित्र्याखाली मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एलएलबीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात आल्या.
त्यासाठी फोर्ट येथील सिध्दार्थ महाविद्यालयाने एलएलबीच्या पाचव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांची परिक्षा ऑनलाईन घेण्यात आली. या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परिक्षा देत दिलेली प्रश्नपत्रिकाही सोडविली. पंरतु मुंबई विद्यापीठाने जेव्हा या विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर झाला तेव्हा सिध्दार्थ महाविद्यालयाच्या ३४ विद्यार्थ्यांना चक्क Public International Law and Human Right मध्ये A A म्हणजे अबसेन्ट मार्क केले. त्यामुळे या ३४ विद्यार्थ्यांचे निकाल नापास आले.
निकाल जाहिर झाल्यानंतर या ३४ विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तात्कार मुंबई विद्यापीठ आणि सिध्दार्थ महाविद्यालयाच्या प्रिंसिपल संध्या डोके यांच्याकडे तक्रारीही दाखल केली. मात्र यावर अद्याप सिध्दार्थ महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाकडून अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आली नसल्याची माहिती या नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एक दिली.
यासंदर्भात सिध्दार्थ महाविद्यालयाच्या प्रिंसिपॉल संध्या डोके यांच्याशी फोन आणि एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मलाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सर्व ऑनलाईन परिक्षा या महाविद्यालयाकडून घेण्यात येतात. महाविद्यालयांनी पाठविलेल्या माहितीनुसारच विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जातो. जर विद्यार्थ्यांनी परिक्षा देवूनही जर गैरहजर दाखविण्यात आले असेल तर सिध्दार्थ महाविद्यालयाने यासंदर्भात मुंबई विद्यापीठाशी पत्र व्यवहार करायला हवा.

Marathi e-Batmya