महायुती सरकारच्या वतीने मागील अडीच तीन वर्षात केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जाहिर केले. या रिपोर्ट कार्डवरून शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी हे रिपोर्ट कार्ड नसून हे डिपोर्ट कार्ड असल्याची टीका केली.
आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीका करतानाच बेरोजगारांना नोकरी देण्याचं आश्वासन आणि लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.
महायुतीने जारी केलेल्या रिपोर्ट कार्डवर भाष्य करताना शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘हे महायुतीचा रिपोर्ट कार्ड नाही, तर सगळं गुजरातला पाठवण्याचा डीपोर्ट कार्ड’ असल्याची टीका करत भाजपाची पॉलीसी डिव्हीईड अँड रूलची आहे. आता निवडणूक लागली आहे, त्यामुळे आता ते सगळीकडे वाद लावण्याच काम करतील. तसेच पीएपी PAP प्रकल्प मुलुंड मध्ये रद्द झाला का ? हा सवाल सरकारला करतानाच आमचे सरकार आल्यावर आम्ही घाई गडबडीत आणि केवळ भ्ष्टाचारासाठी घेतलेले सगळे टेंडर रद्द करणार असल्याचा इशारा यावेळी दिला.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आत्ता महाराष्ट्रला लुटण्याचा काम हे सरकार करतय. यासाठी बीएमसी BMC निवडणुका २ वर्ष घेतल्या गेल्या नाहीत अशी टीकाही यावेळी केली.
सरकारसाठी ‘सबका मालिक’ “अदानी”
राज्यातील सरकार हे केवळ अदानीसाठी काम करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी करत पुढे बोलताना म्हणाले की, ‘आचारसंहिता लागण्यापूर्वी देवनारचा भूखंड सरकारने अदानीला दिला, प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत लोकांना आम्ही काही देत आहोत असा दाखवलं. धारावी प्रकल्पसाठी एकूण १०८० एकर मुंबईची जमीन अदानीच्या घश्यात फुकटात घातली. पुढच सरकार यांचं आलं तर अरबी समुद्रालासुद्धा अदानीचे नाव देतील अशी खोचक टीका करत देवनारचा जो भूखंड अदानीला दिला त्यात राज्य सरकार आणि बीएमसी मध्ये वाद होता कोर्टात मॅटर असताना ही जागा फुकट दिल्याचा आरोपही यावेळी केला.
आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा आणि शिंदे यांचे मालक अदानी आहेत त्यासाठी हे सगळं करतायत. मी जे बोलतोय जे मुद्दे उपस्थित करतोय त्यांनी खोडून काढाव, एक जरी मंत्री बोलतोय का? लँड प्रीमियम बद्दल कोणी काही बोललं ? ७ लाख स्केअर फूटच काम या धारावी प्रकल्प मध्ये करणार आहे. यामध्ये धारावी सोडून हे काम होताय यामध्ये अदानी १ लाख कोटी रुपये कमावणार आहे . सबका मालिक एक साईबाबा आहेत, पण सरकारसाठी सबका मालिक अदानी झालाय’ अशी खोचक टीकाही यावेळी महायुती सरकारवर केली.
महायुती नव्हे महाझुटी- आदित्य ठाकरे
महायुती सरकारने मंत्री मंडळांच्या शेवटच्या बैठकांमध्ये निर्णयांचा धडाका लावला होता. अनेक निर्णय जनतेला आकर्षित करण्यासाठी घेण्यात आले होते . त्यावर बोलताना आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, ‘महायुतीही महाझुटी आहे’ मुख्यमंत्री कुठे भेटायचे ते सांगा, भेटू आणि सगळ्यावर चर्चा करायला मी तयार आहे असं थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी देत मुंबईत टोल फ्री केला, टोल ४५-५० रुपये होता. लोकांना काहीतरी देतो हे दाखवून त्याच्या आड बऱ्याच गोष्टी या सरकारने केल्या आहेत. ५० रुपयांची सूट तुम्हाला दिली जाते, पण त्याऐवजी ५० हजार कोटी फायदा करून घेतायत, असा आरोपही यावेळी केला.
लाडक्या बहिणीला दीड हजारापेक्षा जास्त पैसे देऊ- आदित्य ठाकरेंच आश्वासन
लाडकी बहिण योजनेबाबत मविआ सरकार आल्यावर बंद केली जाणार असल्याचा दावा सरकार मधील पक्षांकडून केला जात आहे. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आम्ही लाडकी बहिणीला दीड हजार पेक्षा जास्त पैसे देऊ, वाढीव पैसे आम्ही देऊ. आम्ही भाजपा सरकार नाही,’ असे यावेळी सांगत राज्यात हे सरकार अ़डीच तीन वर्षापूर्वी आलं. तेव्हा का नाही ही योजना आठवली. केवळ निवडणूका तोंडावर आल्याने महायुती सरकारला ही योजना आठवल्याची टीकाही यावेळी केली.
Marathi e-Batmya