देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, हे खुद्दारांच सरकार, अपात्र ठरतील हे शिल्लक राहिलेल्यांसाठी… प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत फडणवीसांनी घेतला आदित्य ठाकरे यांच्या टीकेचा समाचार

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर लगेच कसबा आणि पिंपरी-चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूकीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय या निवडणूकीनंतर मुंबईसह १४ महापालिकेच्या निवडणूका जाहिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक नाशिक येथे पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही जण म्हणतात की हे गद्दारांच सरकार आहे, पण खरे तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जे गेले त्यांचे गद्दारांच सरकार होते. हे खुद्दार लोकांचे सरकार आहे. ते सांगतात घटनाबाह्य सरकार आहे पण ते सांगण आपल्यासाठी नसून त्यांच्यासोबत राहिलेल्या शिल्लक लोकांसाठी टिकवून ठेवण्यासाठी सांगत असल्याचे स्पष्ट करत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा २०० पेक्षा अधिक जागा जिंकतील असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, आज राज्यात जे सरकार स्थापन झालं आहे. ते गद्दारांचं सरकार नाही, हे खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांची खुद्दारी जनतेसाठी, विचारांसाठी आणि हिंदुत्वासाठी आहे, अशा खुद्दारांचं हे सरकार आहे. पण ते (महाविकास आघाडी) रोज सकाळी उठून हे सरकार बेकायदेशीर आहे, असं म्हणतात. कारण त्यांना भीती आहे की, उरले-सुरलेले १०-१५ आमदारही निघून जातील. म्हणून त्यांना दररोज सांगितलं जातं की, हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार अपात्र ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण जिंकणार आहोत. हा संदेश आपल्यासाठी नाही. जे उरले-सुरले आहेत, त्यांच्यासाठी हा संदेश आहे.

याशिवाय देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काहीही काळजी करू नका. आपण जे केलंय ते नियमाने केलंय. कायद्याने केलंय. कायद्याचा अभ्यास करून केलंय. मला पूर्ण विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आपल्याच बाजुने निकाल लागेल. कारण आपण संविधानासंमत राहून काम केलंय. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला, तर सर्वोच्च न्यायालय उत्तम आहे. पण न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला, तर न्यायालय दबावाखाली आहे. निवडणूक आयोगाबद्दलही त्यांनी असंच म्हटलं आहे. देशातील सर्वोच्च संस्थांवर प्रश्नचिन्ह उमटवण्याचं काम विरोधकांकडून केलं जात आहे असा आरोपही केला.

पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. ते संविधानसंमत आहे. हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करणारच आहे. पण पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात नव्याने दीडपट अधिक जागा जिंकून येणार आहोत. कारण आम्ही जनतेची सेवा आम्ही करत आहोत. तसेच राज्याच्या विकासासाठी आम्ही २०-२० मॅच सुरु केली असून सध्या आमची बॅटींग सुरु आहे आणि आम्हीच जिंकणार असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश, महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करा चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर बैठक

मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *