नाशिक – निफाडः प्रतिनिधी
या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत. त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी प्रतीचे अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं, ही भारतासारख्या देशाला बातमी चांगली आहे का? असा संतप्त सवाल करतानाच जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो त्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही. ही बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येणे हे बेईज्जत लोकांच्या राजवटीत होत असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निफाड येथील जाहीर सभेत व्यक्त केली.
आज जाहीर झालेल्या या अहवालावर बोलताना शरद पवार यांनी जोरदार टीका केली.
हे चित्र बदलायचे की नाही अशी विचारणा करत आपण सत्तेवर असलेल्या सरकारला बदललं पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांची दैना झालीय… शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत… कारखाने आजारी पडले आहेत… मंदीचे संकट आलेले आहे… लोकांची रोजीरोटी जातेय… आज ही सगळी संकट आज महाराष्ट्रात आली आहेत. त्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याची धमक भाजपमध्ये नाही. त्यामुळे यांना सत्तेपासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.
प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याची पावले टाकली ते लोकांना पसंत नाही. दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ऑफिस आहे. काँग्रेसचं कधी राज्य आलं तर कधी पराभव झाला. असे अनेक चढउतार पाहिलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर धाड घालत चार लोकांना ताब्यात घेवून चौकशी सुरु केलीय. निवडणूक सुरु असताना असा प्रकार घडणं योग्य नाही. मलाही त्रास देण्याचा प्रयत्न झाला असे सांगतानाच ईडीचा घडलेला किस्सा त्यांनी सांगितला.
ही काय राज्य चालवायची पद्धत आहे. कोण कुणाच्या ओळखीचा आहे, एवढ्या मुद्दयावर तुम्ही गुन्हा दाखल करता… सत्ता येते… पण सत्ता आल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि डोकं जाग्यावर ठेवायचं असतं असा उपरोधिक सल्लाही त्यांनी भाजप सरकारला दिला.
देशाचे पंतप्रधान भारतात फिरतात किंवा बाहेर परदेशातही जातात. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा आणि मान त्यांनी व आम्हीही ठेवला पाहिजे. ते परदेशात जावून बोलतात ती देशाची भूमिका असते. तो देशाचा विचार असतो, पंतप्रधान देशाचा, गृहमंत्री देशाचा असतो. आज एका वर्तमानपत्रात बातमी आलीय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील अर्थव्यवस्था ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गव्हर्नर यांच्यामुळे डबघाईला आली. तुम्ही अमेरिकेत जावून देशातील महत्वाच्या व्यक्तींबद्दल टिका टिप्पणी कशाला करता. याची जाण यांना नाही का असा सवालही त्यांनी केला.
Marathi e-Batmya