सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख…. तंत्रज्ञानाने विधी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवावा: मुख्यमंत्री

येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. सर्वांचा सहभाग व समर्पणातून निर्माण झालेल्या या विद्यापीठाने आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी आज येथे व्यक्त केला.

वारंगा (नागपूर) येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि ग्रंथालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्न वराळे, न्या. अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा विद्यापीठाचे प्रकुलगुरू न्या. आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय प्रमुख न्या. नितीन सांबरे, न्या.भारती डांगरे, न्या. अनिल किलोर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, देशाचे सॉलिसिटर जनरल ॲड. तुषार मेहता, महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ, विद्यापीठाचे कुलगुरू विजेंदर कुमार, विद्यापीठाच्या कुलसचिव रागिणी खुबाळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, विद्यापीठाची निर्मिती हा दशकाहून अधिक कालावधीचा प्रवास आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिरपूरकर यांनी प्रारंभी या विद्यापीठाच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून फार कमी कालावधीत पूर्णत्वास आला. जुलै २०१६ मध्ये सिव्हिल लाईन्स परिसरात कार्यरत झालेल्या या विद्यापीठाच्या जागेसाठी हायकोर्ट बार असोसिएशनने प्रयत्न केले. जागा मिळाल्यानंतर पायाभूत सुविधांच्या उभारणीचे मोठे आव्हान होते. मात्र लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा यांच्यासह विविध घटक आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे अत्यंत अद्ययावत स्वरूपात हे विद्यापीठ उभे राहिले आहे.

अलिकडच्या काळात नागपूर एक परिपूर्ण एज्युकेशनल हब झाले असून येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठाची झालेली स्थापना ही गौरवाची बाब आहे. राज्य सरकारने प्रशासकीय इमारतीसाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वास्तुशास्त्रज्ञांनी या इमारतीची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये ही वास्तू आदर्श ठरेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर येथे करण्यात आला असून सौरऊर्जा व इतर प्रगत सुविधांमुळे ही इमारत पर्यावरणपूरक झाली आहे. येथे परिपूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती झाली असल्याचे ते म्हणाले. कुठल्याही शिक्षण क्षेत्राची निवड केली तरी त्यात जागतिक स्तरावर कीर्ती व प्रतिभा संपन्न योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

आपल्या भाषणात सरन्यायाधीशांनी विद्यापीठाच्या उभारणीस सहाय्यभूत ठरलेल्या सर्व संबंधितांचा कृतज्ञतेने उल्लेख केला.
प्रारंभी केवळ मुंबई येथे स्थापित करण्यात येणारे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथेही स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाकडून घेण्यात आला. तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठे असणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले असल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या विद्यापीठात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व सुविधा उभारण्यात आल्या आहेत. परिसरातील वातावरणामुळे येथील नैसर्गिक सौंदर्यात भर पडत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मुंबई येथील विद्यापीठाच्या उभारणीसाठी जागेची निवड करण्यात आली आहे. येत्या काळात ही तिन्ही विद्यापीठे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली असतील. येथील पायाभूत सुविधा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असतीलच परंतु शैक्षणिकदृष्ट्या या विद्यापीठांनी जागतिक उंचीची कामगिरी करून दाखवावी. येथील विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर यश संपादन करावे. स्वातंत्र्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या तीन महत्त्वाच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून त्यांची केवळ नावे बदलण्यात आलेली नाहीत. त्यांचे भारतीयीकरण करण्यात आले आहे. या बदलांमुळे नव्या तंत्रज्ञानाची मदत घेणे शक्य होऊन न्यायदान विषयक कामकाजाला गती येईल. तसेच गुन्हे सिद्धीचा दरही वाढेल, असे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, जगातील चौथी अर्थव्यवस्था होताना विविध व्यावसायिक आणि गुंतवणूकविषयक प्रकरणांचा निपटारा गतीने होणे आवश्यक आहे. त्यामुळे गुंतवणुकीस मदत होऊ शकेल. भारतातील संविधान सर्वोत्कृष्ट असून एक शाश्वत मूल्य म्हणून आपल्या संविधानाने आदर्श प्रस्थापित केला आहे. बदलत्या जगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना या विद्यापीठाशिवाय दुसरे स्थळ नाही आपल्यासमोर सायबर क्राईम, सायबर ब्रिचेसचे आव्हान आहे तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्यासाठी संधी आहे. या सर्व तंत्रज्ञानाच्या वापराने विधी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडावी. या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणासोबतच नवाचार, नाविन्यता, नवतंत्रज्ञान, प्रक्रिया आदींचे शिक्षण प्रदान करण्यात यावे. हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम व स्वयंपूर्ण विद्यापीठ म्हणून नावारूपाला येण्यासाठी विद्यापीठाच्या सर्व उपक्रम व प्रयत्नांना शासनाचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे विद्यापीठ आणि अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशी वास्तू उभी राहिल्याचा उल्लेख करून केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, चांगल्या अध्ययन सुविधांमुळे विद्यापीठाची गुणात्मक वाढ होईल. ज्ञानाचे अद्ययावतीकरण महत्त्वाचे असून त्याचे उत्तम उदाहरण या विद्यापीठाच्या माध्यमातून दिले जाईल अशी आशा आहे. ज्ञान ही मोठी शक्ती असून तिचे संपदेत रूपांतर करणे गरजेचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानासारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यापीठाने जागतिक पातळीवर अभिमानास्पद कामगिरी करावी, असेही ते म्हणाले.

मुख्य कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांनी नूतन इमारतीची पाहणी केली. विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या इमारतीची भूमिपूजनही यावेळी सरन्यायाधीशांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू विजेंदर कुमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कुलसचिव रागिणी खुबाळकर यांनी आभार मानले.

About Editor

Check Also

रमेश चेन्नीथला यांचा इशारा, शेतकरी, बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते निर्धाराने लढले

काँग्रेस पक्ष राज्यात आगामी वर्ष संघटन बांधणीवर भर देत गावपातळीपर्यंत नियुक्त्या करण्याबरोबर सेल, विभाग, सेवादलही मजबूत करणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *