मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल भव्य राष्ट्रध्वज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्कवर भव्य राष्ट्रध्वजाचे लोकार्पण

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह यांनी साकारलेल्या २०० फूट उंच भारतीय ध्वजाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार संदीप जोशी आणि विकास ठाकरे, महापौर नीता ठाकरे, प्रभारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी बी, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, परदेशात त्या-त्या देशांचे राष्ट्रध्वज उभारल्याचे दिसत होते. राष्ट्रभिमान जागविण्यासाठी भारतातही राष्ट्रध्वज उभारण्यात यावे अशी मागणी व्हायची मात्र त्यास फ्लॅग कोडची अडचण येत असे. ती अडचण दूर झाल्याने देशात भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहेत. नागपुरातील या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर उभारण्यात आलेला हा राष्ट्रध्वज प्रत्येक नागपूरकरांचा राष्ट्रभिमान जागविणारा असा आहे. याचे उत्तम आरेखन करण्यात आले आहे. नागपुरातून अन्य राज्याकडे जाणाऱ्या शहरांचे प्रतीकही येथील भिंतींवर दिसून येत आहेत. या शहरात असा भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला ते अभिमानास्पद आहे. हा राष्ट्रध्वज बघून देशाभिमाने उर भरून येतो असेही त्यांनी सांगितले. लोकमत वृत्तपत्र समूहाने हा राष्ट्रध्वज उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी कौतुक केले.

डॉ. विजय दर्डा यांनी स्वागत पर भाषण केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील कोनशिलेचे अनावरण झाले. त्यांनी राष्ट्रध्वजवंदन व राष्ट्रध्वजाचे अनावरण केले.

२००९ मध्ये कस्तुरचंद पार्क येथे राष्ट्रध्वज उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. २०१६ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपून झाले. या राष्ट्रध्वजाचे वास्तूविशारद शांतनू भाल्ला आहेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाडीबीटीवर २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना महाडीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढले

राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *