परिक्षार्थींच्या मागणीनुसार रविवारची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांची विनंती आणि एमपीएससीची परिक्षा रद्द

मुंबई : प्रतिनिधी

पुणे येथे झालेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परिक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आता परिक्षार्थींनीच परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

रविवारी होणारी परिक्षा रद्द व्हावी यासाठी काही परिक्षार्थींनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी सदरची परिक्षा पुढे ढकलण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी परिक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनीच ट्विटरद्वारे सांगितले.

राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाची ही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह आयोगाचे प्रभारी सचिव संघ तवरेज आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत उपस्थितांना राज्यातील कोरोना स्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्य सचिवांनी दिली. बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थित सर्व मंत्री आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी साकल्याने चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांचीही मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *