स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात असा आमचा सर्वांचा आग्रह आहे. परंतु काही निर्णय स्थानिक जिल्हा पातळीवर केले जातात. काही ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीत तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत देत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत एकत्र येऊन याबाबत पुढचा निर्णय घेता येऊ शकेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. याबाबत त्यांच्यावर होणारे आरोप हे बिनबुडाचे आहेत. रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांनीही शरद पवार हे जातीवादी नसल्याचे सांगितले आहे. शरद पवार हे नेहमीच सर्व समभावाची आणि समन्वयाची भूमिका मांडत असतात. त्यामुळे त्यांच्यावर होणारे सर्व आरोप हे खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर लोकसभा मतदार संघाबाबत संजय राऊत बोलले असतील, तर ते कार्यकर्त्यांना बरं वाटण्यासाठी बोलले असतील. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. तो त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्यासह पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील आदी उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणाचा लाभ त्या वर्गाला मिळायलाच हवा असे महाविकास आघाडीचे धोरण आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. याबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे. मध्यप्रदेशचा निकाल काय येतोय ते पाहून याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर्षी पाऊस चांगला झाला झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्याबरोबरच हेक्टरी टनेजही वाढले आहे. सगळे कारखाने ऊस संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे परिस्थितीवर लक्ष आहे. ते रोज आढावा घेत आहेत. साताऱ्यात अजिंक्यतारा कारखाना जास्त दिवस चालेल अशी परिस्थिती आहे.
शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी इतर कारखान्यांकडून या उसाचे गाळप करावे. यासाठी १ मे पासून वाहतूक अनुदान आणि रिकव्हरी लॉस दिला जात आहे. सरकारकडून मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्याला दिले जात आहे. शेतकऱ्याला चांगला दर मिळाला पाहिजे ही त्या मागची भूमिका आहे. त्या त्या विभागातील ऊस संपवण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्यांचा हंगाम संपत आला असला, तरी राज्याबरोबर साताऱ्यातही शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. हंगाम संपत आला असला, तरी कारखाने सुरू ठेवून शिल्लक उसाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याबाबतच्या वृत्ताबाबत विचारले असता अजित पवार यांनी हे धांदात खोटे असल्याचे सांगत याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार हे धांदात खोटे आहे. माध्यमांनीही खूप महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. अतिरंजित बातम्यांना प्राधान्य न देता समाजात शांतता, जातीय सलोखा राहील आणि समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी माध्यमांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेवटी माध्यमांची विश्वासार्हताही महत्त्वाची असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Marathi e-Batmya