मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगोलग प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुंबईत आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांना युतीच्या चर्चेसाठी येण्यास मुंबईत वेळ न मिळण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील ईडीच्या गुन्ह्याचे कारण असल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
केंद्रीय मंत्री तथा भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा भाजपा-शिवसेने दरम्यानच्या युतीच्या अंतिम बोलणीसाठी २६ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबईत येणार होते. तशी अधिकृत माहितीही भाजपाकडून २१ सप्टेंबर रोजीच जाहीर करण्यात आली होती. मात्र २४ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द झाल्याचे वृत्त प्रसारीत होण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत त्यावर भाजपाकडूनही अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यातच काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर राज्य शिखर बँकेतील २५ हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात आर्थिक संचानलयाने गुन्हा नोंदविण्याचे वृत्त बाहेर आले. यावरून शरद पवार यांच्यावर गुन्हा नोंद होणार असल्याची पूर्व कल्पना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना असल्यानेच त्यांनी मुंबई दौरा रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांवरील गुन्ह्याचे वृत कळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष पसरला आहे. तसेच आज बुधवारी कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयासमोर आंदोलन केले. कदाचीत शाह मुंबईत आले असते तर त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागले असते. त्यामुळेच उद्या २६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेच्या नेत्यांना चर्चेसाठी अमित शाह यांनी दिल्लीला बोलविल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya