हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र,… जनतेचा पैसा आहे, माणिकाराव कोकाटेच्या घरचा नाही शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा

बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजपा युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिखारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असा अजब प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोकोटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते ते अद्याप पाळलेले नाही, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते, त्यात कर्जमाफीवरून कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. शेतकऱ्याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेच्या घरचा नाही. सरकारची धोरणे जर शेती व शेतकऱ्याला अनुकुल असती तर शेतकरी सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहिल. पण भाजपा युती सरकार हे शेतकरीविरोधी आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. मूठभर उद्योगपतींना १६ लाख कोटींचे कर्जमाफ केले तेव्हा असा प्रश्न विचारण्याची धमक कोकाटे किंवा सरकारने दाखवली नाही, मग शेतकऱ्यांनाच प्रश्न विचारण्याची हिंमत का होते. कोकाटेंनी यापूर्वीही भिखारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतक-यांना एक रुपयांत विमा देते असे वक्तव्य करून शेतक-यांचा अपमान केला होता. सातत्याने शेतक-यांचा अपमान करण्याचा रोग या महोदयांना जडला आहे. त्यांनी राज्यातील शेतक-यांची माफी मागावी.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे वर्तमानपत्रात वाचले पण मंत्री हे मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत, वाट्टेल ते बरळतात. फडणवीस सरकारमध्ये एक एक मंत्री नमुना आहे असे आम्ही म्हटले होते, माणिकराव कोकाटे हा त्यातीलच एक नमुना आहे, अशा मंत्र्यांना आवर घालावी. शेतमालाला भाव नाही, हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे, शेतकरी संकटात असून दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे, त्याची कृषी मंत्री वा भाजपा युती सरकारला लाज वाटत नाही पण उलट शेतकऱ्यांनाच अजब प्रश्न विचारता, हा सत्तेचा माज शेतकरी नक्की उतरवेल हे लक्षात ठेवा, असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *