राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु असून भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात सुरु आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणुका या काही नवीन नाहीत, निकोप लोकशाहीत विरोधी पक्षांनाही तेवढेच महत्व आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात सहा बिगर काँग्रेसचे मंत्री होते, ही आपली संस्कृती व परंपरा आहे पण विरोधकच नको अशी प्रवृत्ती भाजपा व महायुतीची बनली असून त्यातून बिनविरोधसाठी सत्ताधारी कोणत्याही स्तराला जात आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला अर्ज भरू न देणे, धमक्या देणे, दबाव तंत्राचा वापर करणे त्याचबरोबर पोलीस, प्रशासन यांच्या मदतीने बेशरमपणाचा खेळ सुरु आहे आणि निवडणूक आयोग मात्र याचा मूक साक्षिदार बनला आहे, याचा आम्ही निषेध करतो. लोकशाहीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ‘नोटा’चा पर्यायही आहे, बिनविरोधच्या ठिकाणी मतदारांना ‘नोटा’ वापरण्याची संधी द्यावी, अशी मागणीही राज्य निवडणूक आयोगाकडे केली.
राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली…
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संवैधानिक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष परिषदेचा सभापती ही संवैधानिक पदे आहेत, त्यांचा आदराने उल्लेख केला जातो पण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाच्या आपल्या पहिल्या कारकिर्दीत पक्षातंर बंदी कायदा मोडीत काढून लोकशाही व संविधानाच्या छातीत सुरा खुपण्याचे काम केले, म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे. आता हे महाशय महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या नातेवाईकांसाठी अत्यंत खालच्या पातळीवर उतरले आहेत. विरोधकांना अर्ज भरू देण्यात अडथळा आणणे, विरोधकांना धमक्या देणे, पदाचा गैरवापर करणे अशा प्रकारचे वर्तन त्यांनी केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. राष्ट्रपती यांनी याची गंभीर दखल घेऊन राहुल नार्वेकर यांना पदावरून बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना धमकावल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाने चौकशी करा व नार्वेकर यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी पत्र पाठवले होते. पण निवडणुक आयोगाने पुरावे मागितले. घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यांना अडवण्यात आले, धमक्या दिल्या त्यांच्या तक्रारी घेऊन कारवाई करावी. आता चौकशी अहवाल आला असला तरी त्यात केवळ शब्दच्छल करण्यात आलेला आहे.
सत्ताधारी महायुतीमध्ये नुरा कुस्ती..
शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेतील तीन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले असून तेच एकमेकांवर टीका करत आहेत, हा प्रकार ‘मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर’, असा असून महायुतीत ‘नुरा कुस्ती’ सुरु आहे. एवढेच गंभीर आहेत तर अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे नाहीतर भाजपाने अजित पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
Marathi e-Batmya