विधान परिषद निवडणूकीत विरोधकांची मते पुन्हा फुटलेलीच भाजपच्या प्रसाद लाड यांना २०९ तर विरोधकांच्या दिलीप मानेंना अवघी ७३ मते

मुंबई: प्रतिनिधी

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणूकीत कॉंग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत अपेक्षे  प्रमाणे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र निकाल जाहीर होताच विरोधकांच्या आघाडीची मते ही त्यांना राखता आली नसल्याचे स्पष्ट झाले असून विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँंग्रेस आणि काँग्रेसची असलेली मते भाजपच्या प्रसाद लाड यांना बोनस स्वरूपात मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या रिक्त पदासाठी फक्त विधानसभेचे सदस्य अर्थात आमदारांनाच मतदान करण्याचा अधिकार होता. विधानसभेत भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष असलेले १२३ आमदार, शिवसेनेेचे ६३, कॉंग्रेसचे ४२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१, एमआयएमचे २, मनसे १, भारिप बहुजन महासंघ १, सपा १, बहुजन विकास आघाडी २, शेकाप ३ आणि अपक्ष १, माकप १ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र यातील शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांची आमदार की न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. त्यामुळे विधानसभेतील सदस्यांची संख्या २८८ वरून २८७ वर आली. मात्र या निवडणूकीवर एमआयएमच्या २ दोन्ही सदस्यांनी बहिष्कार टाकला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ हे मतदानासाठी आले नाहीत. त्यामुळे २८४ सदस्यांनी या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजाविला.

या पक्षीय बलाबल पाहता भाजपच्या उमेदवाराला भाजपची १२३ आणि शिवसेनेची ६२ मते मिळणे अपेक्षित होती. परंतु लाड यांना २०९ मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांना कॉंग्रेसची ४२ आणि राष्ट्रवादीची ४० मते असे  ८२ मते मिळायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात दिलीप माने यांना अवघी ७३ मते पडली.  त्यामुळे विरोधकांची ९ मते जवळपास फुटली असे मानावे लागेल. त्याचबरोबर २ मते बाद ठरली. या सर्व पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघ, शेकाप, मनसे, माकप या धर्मनिरपेक्ष पक्षांची मते कोठे गेली ? हेही पाहणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा सभागृहाबाहेर भाजपच्या हिंदूत्ववादी विचारणीला विरोध करणारे सभागृहात मात्र त्यांनाच मदत करतात असे चित्र राजकारणाबरोबरच समाजकारणातही दिसने वाईटच म्हणावे लागेल.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *