गुढी पाडव्यानिमित्त मुंबईमध्ये विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झालेला चित्ररथ सहभागी होणार आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे ३०० वे जयंती वर्ष, संविधान निर्मितीला झालेली ७५ वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाचा सोहळा साजरा होत आहे. या सर्व प्रेरणादायी इतिहासाचा विषय घेऊन तयार केलेला चित्ररथ गिरगाव, कुर्ला आणि लालबाग या भागात फिरणार आहे.
प्रसंगी बोलताना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, ” नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा, महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी हा अतिशय चैतनमय उत्सव असतो आणि प्रत्येकाच्या जीवनात एक नवा अध्याय सुरु होतो. हिंदू हिताचा विचार आणि प्रसार हे उद्दिष्ट घेऊन शोभायात्रेसाठी आपल्या विभूतींचे कार्य गौरवणारा हा चित्ररथ आम्ही तयार केला आहे. हिंदू नववर्षाच्या निमित्ताने हे सांगावेसे वाटते कि हिंदू हिंदुस्तानची आत्मा आहे, तो फक्त एक धर्म नाही तर ती एक जीवन पद्धती आहे. डॉ. हेडगेवारांनी त्यावेळी हे सांगितलं होते कि हे हिंदू राष्ट्र आहे आणि असे बोलण्याची त्यावेळी कोणात हिम्मत नव्हती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हिंदू हिताचे कार्य होत आहे. त्यामुळेच तमाम हिंदू समाजाचे आशीर्वाद या सरकार सोबत आहेत.”
या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, संविधान आणि संघाविषयी माहिती फलक लावले आहेत. तसेच एक माहितीपट तयार केलेला असून, तो देखील पूर्ण वेळ चालवण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोळवलकर गुरुजी, डॉ. हेडगेवार यांची वेशभूषा परिधान केलेले कलाकार सुद्धा याठिकाणी असणार आहेत.
Marathi e-Batmya