दिड वर्षापूर्वी राज्यात स्थापन झालेल्या अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा (मार्टी) कारभार मनुष्यबळाअभावी रखडला होता. आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे उच्चस्तरीय समितीने या संस्थेसाठीच्या मान्य ११ पदांना नुकतीच मंजुरी दिली असून नव्या वर्षात संस्थेचा कारभार गतीमान व्हावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली.
यासदंर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, ७ ऑगस्ट २०२४ रोजी मंत्रिमंडळाने ‘मार्टी’ स्थापनेस मंजुरी दिली. सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांचा कारभार स्थापनेनंतर लागलीच सुरु झाला. या संस्थांना अनुदानही मोठ्या प्रमाणात दिले आहे. मात्र ‘मार्टी’ला मनुष्यबळ दिले नसल्याने या संस्थेचे काम रखडले होते. आता ११ पदांना मंजुरी मिळाली आहे. या पदांच्या सेवा प्रवेशाचे नियम व पदभरती होईपर्यंत प्रतिनियुक्तीने कर्मचारी घेतले जातील आणि संस्थेच्या कामास प्रारंभ होईल.
रईस शेख शेवटी म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायातील युवकांसाठी ‘मार्टी’व्दारे स्पर्धा परीक्षा व इतर परिक्षांच्या मार्गदर्शनाचे वर्ग लवकरात लवकर चालू करावेत. संस्थेला पूर्णवेळ कार्यकारी संचालक नेमावा तसेच पुरेसा निधी द्यावा. इतर समाजाच्या संस्था व मार्टी यामध्ये भेदभाव होता कामा नये. संस्थेचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. राज्यभरातील युवकांच्या सोईसाठी संस्थेचे संकेतस्थळ तात्काळ सुरु करावे. अल्पसंख्याक समुदायातील २ टक्केच्या आसपास विद्यार्थी पदवीपर्यंत पोचतात. संस्थेने पीएच.डी.साठीच्या छात्रवृत्ती सुरु करणे आवश्यक आहे, अशी मागणी अल्पसंख्याक विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
Marathi e-Batmya