भारतीय जनता पक्ष महायुती मुंबईतील जमीन, उद्योग व पैसा मोठ्या प्रमाणात एका गुजराती मित्राला देत आहेत, हा मुंबई व मुंबईकरांशी मोठा धोका आहे. मुंबई ही गुजरातच्या मित्रासाठी आहे का, याचे उत्तर महायुतीला द्यावे लागेल. मुंबईतील जमिनी विकून भाजपा शिदेंसेनेने अमाप पैसा जमवला आहे. मुंबईत आता परिवर्तनची गरज असून मुंबईशी धोका करणाऱ्या भ्रष्ट महायुतीला मुंबईकर निवडणुकीत धडा शिकवतील, अशी आशा काँग्रेस नेते पवन खेरा यांनी व्यक्त केली.
मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे झालेल्या विशेष पत्रकार परिषदेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, राष्ट्रीय सचिव सचिन सांवत, उदित राज आदी उपस्थित होते.
यावेळी पवन खेरा म्हणाले की, भाजपा महायुतीने मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार करून मुंबईकरांचा पैसा लुटला आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईकरांना पायाभुत सुविधा मिळत नाहीत. रस्त्यावर खड्डे आहेत, पिण्याचे पाणी मिळत नाही पण पावसाळ्यात घरात पाणी शिरते. दिल्लीपेक्षा जास्त प्रदुषण मुंबईत आहे. शाळा, बेस्ट बस, बीएमसीची रुग्णालये यांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. विकासासाठी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी मिळाला पाहिजे पण तो विरोधी पक्षाला दिला जात नाही, हा पैसा मोदी व अमित शाह यांचा नाही तर जनतेचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्ष का टाळल्या याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. निवडणुका आल्या की भाजपाला बांग्लादेशींचा मुद्दा आठवतो व व नंतर ते विसरून जातात. आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत तेथेही तोच मुद्दा सुरु आहे. देशात अवैध बांग्लादेशी आले आहेत, तर मोदी शाह काय करत आहेत, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असेही यावेळी सांगितले.
यावेळी उदित राज म्हणाले की, मुंबईत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणुका लढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांनी काँग्रेस व वंचित आघाडीला मतदान करावे. भाजपा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचे काम करत आहे तर ते वाचवण्याची लढाई काँग्रेस नेते राहुल गांधी लढत आहेत. भाजपा हिंदु मुस्लीम असा वाद उभा करून मते मागत आहेत, त्यांच्या या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही, असेही यावेळी सांगितले.
मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यावेळी म्हणाले की, भाजपा नेते अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेले विधान महाराष्ट्रविरोधी असून आम्ही त्याचा निषेध करतो. पण मुख्यमंत्री व भाजपा या विधानाचे समर्थन करत आहे का नसेल तर त्यांनी त्याचे खंडन करावे. अण्णामलाईला यांना जर धमक्या दिल्या जात असतील तर भाजपा सरकार व फडणवीस अपयशी आहेत असे म्हणाले लागेल, भाजपा सरकार त्यांच्याच नेत्यांना संरक्षण देऊ शकत नाहीत का असा सवालही करत निवडणूक आयोग भाजपीच बी टीम झाली आहे, भाजपा व मित्रपक्षांना ते खुली सुट देत आहेत, निवडणूक आयोग त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. पैसे पकडले जात आहेत पण कारवाई होत नाही, असेही म्हणाले.
लाडकी बहिण योजनेवर बोलताना सचिन सावंत म्हणाले की, ही योजना बहिणींना मदत करण्याच्या भावनेतून नाही तर हा देवाण घेवाणचा व्यवहार झाला आहे, यात कोणत्याही भावना वा संवेदना नाहीत. मतांच्या जोगव्यासाठी दोन महिने लाडक्या बहिणींचे पैसे थांबवून ठेवले. हे आप्पलपोटे स्वार्थी भाऊ आहेत, बहिणीला ओवाळणी टाकतात व त्याबदल्यात मतं मागतात. हा जनतेचा पैसा आहे, देवेंद्र फडणवीस वा एकनाथ शिंदे स्वतःच्या खिशातून ते देत नाहीत असे सांगितले.
Marathi e-Batmya