Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचे मत, आरक्षणासंदर्भातील निकाल संररचनेच्या विरोधात वर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाच

आमच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करायचे की नाही, क्रिमीलेयर लावायचे की नाही याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही, तर याचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाच असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीतील वर्गिकरणास मान्यता देत क्रिमीलेयर लागू करण्याबाबत भाष्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी त्यासंदर्भात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने क्रिमीलेयर आणि आरक्षण वर्गीकरणासंदर्भातील जो निर्णय दिला होता. त्या संदर्भातील रिव्हिव पीटीशन आम्ही दाखल केली. उद्या ती पीटिशन चेंबरमध्ये हिअरिंगला येणार असल्याचेही सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ब्रिटिशांच्या काळामध्ये आणि त्या आधीच्या कालावधीमध्ये ज्यांना कोणाला आरक्षण देण्यात आले आहे त्या सगळ्यांचा प्रशासनात कुठेही सहभाग नव्हता. स्वातंत्र्यानंतर राज्य चालवण्यासाठी सर्वांचा सहभाग असला पाहिजे. ज्यांना वैदिक पद्धतीने नाकारण्यात आले होते, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून स्थान देण्याची तरतूद संविधानात करण्यात आल्याचे सांगितले.

आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, इथे एससी आणि एसटी यांची संविधानिक कमिटी आहे. या संविधानिक कमिटीला एससी आणि एसटी यांची परिस्थिती सुधारली आहे का ? याचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्याही एससी आणि एसटी कमिशनने असे कुठेही नमूद केले नाही की, एससी आणि एसटी यांची परिस्थिती ७० वर्षांत पाहिजे तशी झाली आहे असे कुठेच नमूद केलेले नाही. याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांसमोर मत मांडणार असल्याचेही यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, न्यायालयाने सुमोटो म्हणजेच आपल्यावर जबाबदारी घेऊन काही जणांच्या पीटिशनवर क्रिमीलेयर आणि आरक्षण वर्गीकरणावर जो निकाल दिला आहे. तो देशाच्या मूलभूत संरचनेच्या विरोधात असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हा देश कधीही एकत्रित नव्हता, त्याचे सर्वात मोठे कारण जात आणि धर्म होते. यामुळे समाज एकत्र राहिला नाही. तो जाती, धर्मामध्ये विखुरला गेला आणि एकमेकांमध्ये लढत राहिला. त्यामुळे भारताच्या बाहेरील शक्तींनी भारतावर राज्य केले. ज्यांना नाकारण्यात आले, त्यांना आरक्षणामुळे सत्तेत स्थान आहे. आरक्षण हे विकासाचे साधन नाही, तर ते प्रतिनिधित्व देण्याचे साधन असल्याचे म्हणत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर निशाणा साधत क्रिमीलेयर आणि आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालाच्या माध्यमातून देशाच्या एकतेवरच हल्ला करत असल्याचा आरोप केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत