मागील तीन-चार दिवसांपासून संसदेत राज्यघटना स्विकारण्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेचा पहिला टप्पा लोकसभेत काल पुर्ण झाला. राज्यसभेत उद्यापासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत म्हणाले की, आमदारांना फोडणे, विद्यमान मुख्यंत्र्यांना तुरुंगात डांबणे कोणत्या कायद्यात बसते असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, सांसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र विरोधी पक्षच राहु नये यासाठी विरोधकांच्या मागे चौकशा यंत्रणांचा ससेमिरा लावणे विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणे हे कोणत्या कायद्यात बसते असा सवालही यावेळी केला.
संजय राऊत पुढे टीका करताना म्हणाले की, ईडी, सीबीआय कधी भाजपाच्या घरी गेलीय हे दाखवून द्यावं. उलट आमच्याकडे असताना ज्यांच्या घरी गेली आता ते भाजपाच्या मांडीवर बसले असून मोदी आता त्यांना दूध पाजत आहेत अशी उपरोधिक टीका करत आईच्या ममतेने मोदी त्यांची काळजी घेत आहेत. ७० हजार कोटींचा ज्यांच्यावर आरोप केला त्यांना तुमच्याच उपस्थितीत उपमुख्यंत्री पदाची शपथ दिली जाते हे कोणत्या राज्यघटनेत लिहिलंय ते सांगा अशी टीकाही यावेळी केली.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, आमदार अपात्रता प्रकरणी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे मोदींच्या दबावाखाली निर्णय घेतला नाही असा आरोप करत ज्या पद्धतीने राज्य सरकारमधील आमदार फोडले, ते सर्व जण १० व्या परिशिष्टानुसार सर्वजण अपात्र ठरले पाहिजे होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली त्यांनी निर्णय दिला नाही. हे काय राज्यघटनेत बसतं का असा सवाल करत वास्तविक पाहता डि वाय चंद्रचूड यांच्यावर खटला भरला पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी उपस्थित केली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशाचा आधार राज्यघटना आहे, ती राज्यघटना उधवस्त करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे ते जे काम करत आहेत, ते राज्यघटनेविरोधी असल्याचा आरोपही यावेळी केला.
यावेळी संजय राऊत यांनी मध्य प्रदेशातील परमार कुटुंबियांनी केलेल्या आत्महत्येवर बोलताना म्हणाले की, मध्य प्रदेशमध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. त्यांच्या लहान मुलाने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत गल्ल्यात जमवलेला पैसा यात्रेसाठी राहुल गांधी यांना दान केला. त्याचा राग मनात ठेवून ईडीनेकारवाई केली. त्यांच्यावर भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे परमार पती-पत्नीने आत्महत्या केली. हे मोदींनी सांगाव, मोदी हे देशाला लाभलेले मागील ६५ वर्षातील असत्य बोलणारे महान पंतप्रधान असल्याचा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
शेवटी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे अदानीला विरोध करतायत त्यांना राज्यघटना विरोधी ठरविले जात आहे. राज्यघटनेचा नारा आहे सत्यमेव जयते पण मागील १० वर्षात असत्याचा विजय करण्याचे काम मोदी काळात सुरु आहे. जे अदानीला विरोध करतात ते राज्यघटना विरोधी असल्याचं मोदींना सांगायचाय असा आरोपही यावेळी केला.
Marathi e-Batmya