सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहार राज्यातील बोधगया येथे तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेसाठी इच्छुक व पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले असून दि. १५ मे २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यावरील असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच शासन निर्णयातील इतर अटी व शर्ती लागू राहणार असून लाभार्थी प्रवासासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
या यात्रेसाठी प्रवास, निवास व भोजनाची सुविधा शासन नियमानुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच यात्रेत सहभागी होता येईल. ७५ वर्षांवरील अर्जदारांना त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एका व्यक्तीस सोबत नेण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अपूर्ण अथवा अपात्र अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तसेच अर्जामध्ये खोटी माहिती आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Marathi e-Batmya